शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेनिमित्त राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसंवाद यात्रा काल (मंगळवार) संध्याकाळी औरंगाबादमध्ये दाखल झाली. यावेळी वैजापूर तालुक्यातला महालगावात काल आदित्य यांची सभा झाली. परंतु या सभेला जात असताना आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दगडफेक झाल्याचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबाद ग्रामीण पोलीस कार्यालयाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, “काल महालगावात आदित्य ठाकरे यांची सभा होती. या सभेला जात असताना वाटेत थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान एक कॅमेरामन जखमी झाला आहे. परंतु पोलिसांनी सदर परिस्थिती नीट हाताळली, तिथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांच्या कारवर कोणत्याही प्रकारची दगडफेक झालेली नाही.

लांजेवार म्हणाले की, “आदित्य यांच्या सभेदरम्यान देखील दगडफेक झाली नाही. तसं झालं असतं तर मोठा गोंधळ झाला असता. परंतु सभा सुरळीतपणे पार पडली. त्यानंतर आदित्य ठाकरे सुखरूप परतले. पोलिसांकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी जो दावा केला आहे. त्यानंतर आम्ही परिस्थितीची चौकशी करू.”

हे ही वाचा >> “कदाचित गद्दारांच्या गटानं…”, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; शिवसंवाद यात्रेदरम्यानच्या ‘त्या’ प्रकारावर भाष्य!

नेमकं काय घडलं होतं?

महालगावी जात असताना आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला होता. आदित्य यांचा ताफा जिथून जात होता तिथे एक मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीच्या वेळी डीजे बंद केल्याच्या रागात काही तरुणांनी गोंधळ घातला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray no stones were thrown at car says police asc