Ajit Pawar Meets Baba Adhav at Pune Protesting to Save Indian Democracy : ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे सध्या पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. देशातील लोकशाही टिकावी, संविधानाचं संरक्षण व्हावं अशी मागणी करत ते आंदोलन करत आहेत. भारतातील लोकशाहीचं अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचं आढाव यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार ते गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज (३० नोव्हेंबर) त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा, मतदारांना आर्थिक प्रलोभनं दाखवून मतं मिळवल्याचा संशय आढाव यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. तसेच बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली आणि बाबा आढाव यांनी उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “बाबा आढाव म्हणत आहेत की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत सहा महिन्यात लोकांचं मत इतक्या प्रमाणात कसं काय बदललं? पाच महिन्यांत जनतेचा कौल कसा काय बदलला? मला त्यावर आम्ही काय करू शकतो? १९९० च्या लोकसभा निवडणुकीवेळी देशातील जनतेने केंद्रात अटल बिहारी वाजपेयी (एनडीए) यांना पाठिंबा दर्शवला. परंतु, महाराष्ट्रात विलासराव देशमुख व आमचं (राष्ट्रवादी काँग्रेस) सरकार आलं. विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले”.

हे ही वाचा >> “शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”

अजित पवारांनी दिलं २५ वर्षे जुनं उदाहरण

अजित पवार म्हणाले, बारामतीच्या मतदारांचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यावेळी दोन्ही निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. बारामतीतल्या मतदारांनी एकाच वेळी लोकसभेसाठी शरद पवारांना मतदान केलं आणि त्यांनी विधानसभेला माझ्यासह इतर उमेदवारांना मतदान केलं. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बारामतीमधून शरद पवारांना ८५,००० मतांचं लीड (मताधिक्य) मिळालं होतं. तर, मला केवळ ३५ ते ४० हजार मतांचं लीड मिळालं होतं. तेव्हा मी मतदारांवर, लोकशाही प्रणालीवर, निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. आता हे पराभूत उमेदवार सांगतात की ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे. मी म्हणतो की त्यांनी पुरावे दाखवावे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar meets baba adhav at pune remark on how peoples opinion change after lok sabha election 2024 asc