मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव घेण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. पालिकेने दोन्ही गटांना येथे मेळावा घेण्याबाबतची परवानगी नाकारली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असेल? आगामी काळात आंदोलने, निदर्शने यांच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढवली जाणार का? याबाबत उद्धव ठाकरे गटातील नेते तथा आमदार अनिल परब यांनी सविस्तर भाष्य केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही आमची पुढची रणनीती ठरवू असे अनिल परब म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या कार्यालयावर NIA ची धाड; चार जण ताब्यात

न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकाल आल्यानंतर शिवसेना पुढील रणनीती ठरवणार आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे शिंदे गटाकडून म्हटले जात आहे. मात्र हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. खरी शिवसेना कोणाची, हे न्यायालय आणि निवडणूक आयोग ठरवेल. खरी शिवसेना काय आहे, हे महाराष्ट्राने काल (२१ सप्टेंबर) मुंबईत पाहिले आहे.

हेही वाचा >>> मोठी बातमी! शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!

पालिकेने दोन्ही गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. कदाचित पोलिसांनी पालिकेला याबाबत अहवाल दिला असेल. या अहवालाच्या आधारावरच पालिकेने तसे पत्र दिले असेल. या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. उद्या या सर्वाचीच न्यायालयात चर्चा होईल. उद्या न्यायालय निकाल काय देणार हे पाहिले जाईल. त्यानंर रस्त्यावरची लढाई लढायची की नाही ते ठरवले जाईल, असे अनिल परब म्हणाले. तसेच न्यायालयात आमच्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab on uddhav thackeray group upcoming planning for dussehra melava prd