पाणी टंचाईमुळे महाराष्ट्रात तीव्र दुष्काळाची परिस्थिती जाणवत आहे. २० मे रोजी महाराष्ट्रात पाच टप्प्यातील मतदान संपन्न झाल्यानंतर राज्यातील दुष्काळाच्या झळांचे चित्र माध्यमातून दिसण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवस सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी गेले होते. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेत-शिवारात वेळ घालवला. त्यांचा एक व्हिडीओ विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“महाराष्ट्रातील ही दोन चित्र मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवागार चारा आणि दुसरीकडे मराठवाड्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या गुरांना कोरडा चाराही मिळत नाहीये. गुरांचा चारा आणि पाण्याची सोय करण्यासाठी शेतकरी कुटुंबांना घरातील स्त्रीचे सोने गहाण ठेवून पैश्याची जुळवाजुळव करण्याची वेळ आली आहे आणि महायुती सरकार मात्र अजूनही ढिम्मच! आचारसंहितेचे कारण दाखवून सत्ताधारी स्वतःच्या बेजबाबदार कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे हे महाराष्ट्र बघत आहे!”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Maharashtra Exit Poll 2024 Live : ठाकरे वि. शिंदे, पवार वि. पवार, ‘अब की बार’ कोण बाजी मारणार?

शेतकरी मरतोय कृषी मंत्री परदेशात फिरतोय

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स वर आणखी एक पोस्ट टाकत कृषीमंत्र्यांवरही टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे परदेशात गेले असल्याची टीका त्यांनी केली. “राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने दुष्काळ संदर्भात नेमलेल्या विदर्भाच्या समितीची आज बैठक पार पडली. ५ जून पासून विदर्भात काँग्रेस पाहणी दौरा करून त्यासंदर्भात अहवाल राज्य सरकार पुढे मांडून शेतकऱ्यांसाठी आम्ही मदतीची मागणी करणार आहोत”, असे ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर आहेत, ते बाहेर असताना आयुक्तांची बदली होते.पूर्णवेळ सचिव नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना बैठक होत नाही
खतांचा तुडवडा आहे, बियाणाचे दर वाढले, बियाण्यांसाठी लोक रांगेत उभे आहेत. या सर्व परिस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी परदेशात मजा मारत आहेत. शेतकरी जगला काय आणि मेला काय या सरकारला काय फरक पडतो? राज्यातील शेतकऱ्यांप्रती महायुती सरकारची अनास्था यामधून दिसत आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly lop vijay wadettiwar criticiz cm eknath shinde over drought situation in maharashtra kvg