पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर: राज्यभर उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, मुंबईतील सांताक्रूझमध्ये बुधवारी राज्यातील सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर उष्णतेच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असून, उकाडय़ाने त्यात भर घातली आहे. २५ ऑक्टोबपर्यंत उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.यंदाचा हिवाळा उष्ण असल्याचा अंदाज खरा ठरत असून, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअस तापमान सांताक्रूझमध्ये नोंदण्यात आले. डहाणू ३४.७, कुलाबा ३३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 विदर्भालाही तापमानवाढीचा तडाखा बसला आहे. गेल्या आठवडय़ात अकोला जिल्ह्यात ऑक्टोबरमधील सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. बुधवारीही ते ३६.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. वर्धा येथे ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान ३३ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान असून ही वाढ दोन ते चार अंश सेल्सिअसने होत आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत तापमानासह हवा प्रदूषणाचा निर्देशांकही वाढत आहे.

हेही वाचा >>>सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन मृत्यू प्रकरण : आदित्य ठाकरेंची उच्च न्यायालयात धाव

 गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मराठवाडय़ातील तापमानातही ऑक्टोबरमध्ये साधारणत: एक ते दीड अंशाची वाढ दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात कमाल तापमान ३३ ते ३४.४ (पान ४ वर) (पान १ वरून) अंशांपर्यंत नोंदविण्यात आले होते. नांदेड आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता तापमानातील हे बदल लक्षणीय मानले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सोलापुरात ३६, पुणे, सांगलीत ३४.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.राज्यातून मोसमी वारे माघारी गेल्यानंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत असल्याने तापमानात वाढ होताना दिसत आहे. ही स्थिती २५ ऑक्टोबपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. यंदा एल-निनोचे वर्ष असल्यामुळे सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होत आहे. हिवाळय़ातही कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“शरद पवार दहशतवादी देशांच्या पाठिशी का उभे राहत आहेत? हे सगळं मतांच्या…”, भाजपाचा सवाल

कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यावर परिणाम नाही

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांच्या पश्चिमेकडे बुधवारी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र एका आठवडय़ात म्हणजे २१ ऑक्टोबरनंतर विकसित होऊन ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. बंगालच्या उपसागरात म्यानमारच्या किनारपट्टीवर बुधवारी तयार झालेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रुपांतर २१ ऑक्टोबरला कमी दाबाच्या क्षेत्रात होऊ शकते. त्यानंतर त्याची दिशा स्पष्ट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा मोसमी वारे माघारी परतताना पाऊस पडला नाही. बिगरमोसमी पाऊसही अपेक्षित प्रमाणात झाला नाही. त्यामुळे हवेतील आद्र्रता कमी झाली आहे. २१ सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तावर येतो. सूर्याला विषुववृत्त ओलांडून जाण्यासाठी ४५ दिवसांचा काळ लागतो. या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात सूर्याची उष्णता जास्त मिळते. निरभ्र आकाश आणि आद्र्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे कमाल तापमान वाढते. यंदा २५ ऑक्टोबपर्यंत तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. – माणिकराव खुळे, निवृत्त शास्त्रज्ञ, हवामान विभाग

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atwaves are intense across the state the highest temperature recorded in the state amy