राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भाष्य केले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे अजित पवार म्हणाले होते. अजित पवार यांच्या या विधानावर भाजपा तसेच शिंदे गटातील नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी तर अजित पवारांनी २४ तासांच्या आत माफी मागावी अशी मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या धार्मिक परंपरांचा प्रचंड अभिमान होता. ते धर्माचे पुरस्कर्ते होते. तुमच्या पवार घराणाऱ्याचा फडतूस राजकारणाकासाठी छत्रपती संभाजी महाराजांना निधर्मी किंवा सेक्युलर करू नका. २४ तासांच्या आत माफी मागा अन्यथा उद्यापासून सगळा हिंदू समाज तुमच्याविरोधात रस्त्यावर उतरेल,” असा इशारा तुषार भोसले यांनी दिला आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

हेही वाचा >>> ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ म्हणणाऱ्या अजित पवारांवर संभाजीराजे संतापले; म्हणाले “विकृत…”

विधानसभेत बोलत असताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भाष्य केले होते. “महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.

हेही वाचा >>> “अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यात…”, अमोल मिटकरींचं मोठं विधान; अन्ना हजारेंनाही केलं लक्ष्य!

अजित पवार यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी महाराज हे धर्मवीरच होते, असे फडणवीस म्हणाले. “छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले, धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारलं? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी त्यांनी बलिदान दिले. त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader tushar bhosale demands apology of ajit pawar for commenting on sambhaji maharaj prd