मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका जाहिरातीत राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे असं म्हणत सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं. काही ठिकाणी बॅनरबाजी करत एकमेकांवर टीका करण्यात आली. भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी ‘बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होऊ शकत नाही.’ असं वक्तव्य केलं. या पार्श्वभूमीवर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर महाराष्ट्रात कोण? असा प्रश्न पत्रकारांनी अनिल बोडेंना विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (१५ जून) अमरावतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“देशात मोदी, मग राज्यात कोण?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, खासदार अनिल बोंडे म्हणाले, “सध्या आमच्या डोळ्यासमोर तातडीने लोकसभा निवडणूक आहे. त्यासाठी सर्व काम सुरू आहे. आता नऊ वर्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी लोकांपर्यंत पोहोचवत आहे.”

“मोदींचं काम जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपाकडून विशेष महासंपर्क अभियान”

“यासाठी भाजपाने विशेष महासंपर्क अभियान राबवलं आहे. यात जाहीर सभा होत आहेत. पत्रकार परिषदा होत आहेत. विधानसभा स्तरावर व्यापारी संमेलन, नागरिकांचं संमेलन, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं संमेलन, मीटिंग विथ टिफीन या सर्व गोष्टी होत आहेत. या अमृत काळात भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व मिळावं, सक्षम नेतृत्वाच्या मदतीने भारत पुढे जाऊ शकतो हा विश्वास सर्वांना आहे. त्यामुळे सर्वजण एकदिलाने एकजुटीने प्रत्येकाच्या घरात जाणार आहोत. तसेच पत्रकं वाटून लोकांशी चर्चा करणार आहोत,” असं मत अनिल बोंडेंनी व्यक्त केलं.

लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या जाहिरातीवरून अनिल बोंडेंचे सूर बदलले

विशेष म्हणजे एका दिवसापूर्वी लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या जाहिरातीवरून टीका करणाऱ्या भाजपा खासदार अनिल बोंडेंचा आज (१५ जून) सूर बदलला. लायकी पाहून बोलावं अशी टीका करणाऱ्या शिंदे गट समर्थक बच्चू कडूंनी केलेल्या टीकेवर अनिल बोंडे यांनी बोलणे टाळले.

“भाजपा-शिवसेनेत सलोख्याचं, समन्वयाचं वातावरण निर्माण करण्याला सुरुवात”

अनिल बोंडे म्हणाले, “आमदार बच्चू कडू काय बोलले हे मी ऐकलं नाही, परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे याची दखल घेतील. भाजपा-शिवसेनेमध्ये (शिंदे गट) सलोख्याचं, समन्वयाचं वातावरण निर्माण करण्याला सुरुवात झाली आहे.”

हेही वाचा : “त्यांनी लायकी पाहून बोलावं”, एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या भाजपा खासदारावर बच्चू कडूंचा पलटवार, म्हणाले, “अक्कल नसल्यासारखे…”

“आता केवळ एकच ध्येय आहे, ते म्हणजे…”

“आता केवळ एकच ध्येय आहे, ते म्हणजे २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा भारताचे पंतप्रधान बनवणे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अमृत काळाचं नेतृत्व करून भारताला एक नंबरचं राष्ट्र बनवण्याचा संकल्प आम्ही करतो आहे,” असं मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp anil bonde comment on pm modi in centre who will be in maharashtra pbs