SC on Maharashtra Satta Sangharsh Updates: राज्याच्या सत्तासंघर्षाचा निर्णय अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. झिरवळ यांचा फोन बंद येत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, टीव्ही ९ नं दिलेल्या वृत्तानुसार झिरवळ सध्या नाशिकमध्ये असल्याचाही दावा करण्यात आला आहे. यामुळे सध्या नरहरी झिरवळ यांच्याविषयी संभ्रम निर्माण झालेला असतानाच राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी झिरवळांविषयी सूचक विधान केलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांचाही उल्लेख केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उदय सामंत?

“निकालानंतर भरपूर घडामोडी घडतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले काही आमदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातले काही आमदार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. याची प्रचिती तुम्हाला एक-दोन महिन्यांत येईल”, असा मोठा दावा उदय सामंत यांनी कला आहे.

संजय राऊतांना टोला

दरम्यान, संजय राऊतांनी आज सकाळी केलेल्या एका ट्वीटवरून उदय सामंत यांनी टोला लगावला आहे. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं होतं. त्यावरून उदय सामंतांनी टोला लगावला आहे. “संजय राऊत नवकवी झाले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याव्यतिरिक्तही महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यांची टेप रोज सकाळी साडेनऊ वाजता वाजत असते. त्याला प्रत्येकवेळी उत्तर दिलं पाहिजे असा भाग नाही. शिल्लक असणारे आमदार-खासदार सांभाळण्यासाठी कोणत्यातरी नेत्यानं बोललं पाहिजे. म्हणून ते रोज सकाळी बोलत असतात. त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाहीत”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

Maharashtra Political Crisis: अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मला वाटतंय कदाचित…!”

“आता ते शरद पवारांनाही सल्ला देत आहेत. आता काय म्हणावं? शरद पवारांनी संजय राऊतांना ज्या कानपिचक्या दिल्या आहेत, त्याचं आत्मचिंतन संजय राऊतांनी करायला हवं. दुसऱ्यांच्या पक्षात काय चाललंय यापेक्षा आपला पक्ष किती आणि कसा संपतोय याकडे त्यांनी लक्ष ठेवायला हवं”, असं उदय सामंत म्हणाले.

नरहरी झिरवळ नॉट रीचेबल?

“ते का नॉट रीचेबल आहेत हे मला कसं कळणार? पण काल त्यांनी जे वक्तव्य केलं, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधी अशी वक्तव्य करणं योग्य आहे की अयोग्य आहे? एखाद्या जबाबदार पदावरील व्यक्तीनं असं सांगावं की १६ जणांचं प्रकरण माझ्याकडे आलं तर मी त्यांना अपात्र ठरवेन हे घटनेला धरून नाही. झिरवळ साहेबांना अजित पवार आणि शरद पवारांनी हे लक्षात आणून दिलं असेल. म्हणून ते कदाचित नॉट रीचेबल झाले असतील”, अशी खोचक प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde fraction mla uday samant mocks narhari zirval pmw