यवतमाळमधून राजश्री पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. या ठिकाणाहून भावना गवळी खासदार आहेत. मात्र त्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजश्री पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“महायुतीच्या उमेदवारांचे फॉर्म भरुन आम्ही आलो आहोत. राजश्री पाटील यांनी फॉर्म भरला आहे. राजश्रीताई या यवतमाळ वाशिमची लेक म्हणून तुमच्यासमोर आल्या आहेत. जे वातावरण पाहतोय त्यावरुन रेकॉर्डब्रेक विजय राजश्री पाटील मिळवतील याची खात्री आहे. माहेरच्या मायेने इथले सगळे मतदार लेकीला निवडून देतील यात मला काही शंका वाटत नाही. राजश्री पाटील या धडाडीच्या नेत्या आहेत. त्या धडाडीच्या वक्त्या आहेत. त्याचप्रमाणे त्या धडाकेबाज कामही करतात. त्यांना सगळ्या योजना लक्षात आहेत.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आणि त्यांनी राजश्री पाटील यांचं कौतुक केलं.

हिंगोलीतही महायुतीचे खासदार येतील

हिंगोलीमध्ये चांगलं काम चाललं आहे. यवतमाळ आणि हिंगोलीत महायुतीचे खासदार निवडून येतील यात शंका नाही. भावना गवळी यांनीही चांगलं काम केलं आहे. आता भावना गवळी यांचं मार्गदर्शन राजश्री पाटील यांना होईल. राजकारणात काही गोष्टी कराव्या लागतात. मात्र एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दिलेला शब्द पाळणारा मी आहे

दिलेला शब्द हा एकनाथ शिंदे आहे. कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम महायुतीत होणार नाही. यवतमाळ वाशिमच्या मतदारांनी शिवसेनेला, भगव्याला साथ दिली आहे. आज आपण पाहतोय की बाळासाहेबांच्या विचारांनी जी भाजपाशी युती केली त्याचा आपण आदर केला आहे. मागची निवडणूक आपण युती म्हणून लढलो. एकीकडे बाळासाहेबांचा फोटो एकीकडे नरेंद्र मोदींचा फोटो लावून आपण जिंकलो.

उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

युती म्हणून २०१९ निवडणूक आपण लढवली होती. लोकांनी कौलही आपल्याला दिला. त्यावेळी जो कौल लोकांनी दिला होता तो धुडकावला. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्यांच्याशी कधीही संग करायचा नाही अशा काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. लग्न एका बरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर हे पाप जेव्हा केलं त्याचवेळी एकनाथ शिंदेंमधला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक जागृत झाला आणि आम्ही उठाव केला. सामान्य लोकांच्या मतांचं सरकार आलं. युतीचं सरकार येण्यापूर्वी सगळं बंद होतं, ठप्प होतं. सुरु असलेले प्रकल्प बंद पाडले जात होते. जलयुक्त शिवार योजना बंद केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या आकसापोटी ही योजना बंद केली होती. सण, उत्सव या सगळ्यावर बंदी होती. आमच्या सरकारने सगळी बंदी उठवली. तसंच ठप्प झालेले प्रकल्पही सुरु केले असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. आम्ही जो निर्णय घेतला तो चुकीचा असता तर मोठे निर्णय घेण्याचं धाडस कुणी केलं नसतं. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde slams uddhav thackeray about 2019 vidhansabha election and mva scj