महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमधल्या निर्धार मेळाव्यात भाषण केलं. या भाषणात त्यांनी वेगळी भूमिका का घेतली त्याचं कारण स्पष्ट केलं. तसंच नितीशकुमार, ममता बॅनर्जी आणि जयललिता यांचं उदाहरण देत शरद पवारांचं नाव न घेता टोलाही लगावला. महाराष्ट्राने १९७८ पासून वेगळ्या राजकीय भूमिका पाहिल्या आहेत असंही अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. Latest Marathi News

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमची विचारधारा स्पष्ट आहे

काही जण विचार असतील की ही भूमिका का घेतली? आम्ही काही साधूसंत नाही. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम केलं. कुठलाही राजकीय पक्ष देशपातळीवर जर नजर टाकली तर वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पक्षांबरोबर जातात. मात्र आपली विचारधारा सोडत नाहीत. मी निर्धार सभेच्या निमित्ताने मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आमची विचारधारा स्पष्ट आहे.

छत्रपती शिवरायांनी दाखवलेल्या मार्गावरच आमची वाटचाल

कुठल्याही समाजाला त्यांनी आपल्या भागांमध्ये गुण्यागोविदांने रहावं, त्यांच्यात एकोपा रहावा. छत्रपती शिवरायांची ही भूमिका होती. त्याच मार्गावर आम्ही चालतो आहोत. सध्या महाराष्ट्राचं वातावरण वेगळ्या पद्धतीचं आहे असं दिसतं आहे. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होते. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. संविधान दिन आपण नुकताच साजरा केला. मात्र हा अधिकार वापरत असताना इतरांना त्रास होणार नाही, भावना दुखावणार नाही, समाजांमध्ये अंतर पडणार नाही अशी भूमिका सगळ्यांनीच घेतली पाहिजे.

जितक्या व्यक्ती असतात तितके विचार वेगळे असतात. मी जे सांगतो ते १०० टक्के पटलंच पाहिजे नाही. माझी एखादी गोष्ट पटली नाही तर त्यात चर्चा होऊ शकते. विचारांची देवाण-घेवाण होऊ शकते. आपण जर मिळालेल्या संधीचा फायदा वंचित माणसाच्या, समाजातल्या शेवटच्या माणसाला पुढे आणण्यासाठी काम करायचं असतो. याच पद्धतीने आम्ही पुढे जातो आहोत.

विरोधात राहून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत

आम्ही लोकांचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आलो आहोत. विरोधी पक्षात राहून अडचणी सोडवल्या जाणार आहेत का? निधी दिला जाणार आहे का?, लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का? आपले विचार पक्के ठेवून आपल्याला काम करता आलं आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा सत्तेतून बहुजन समाजाचा विकास या सूत्रावर जर आपण पुढे गेलो तर बिघडलं काय? शेवटी लोकांसाठीच कामं करायची असतात, त्यामुळेच आम्ही सत्तेत येण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळेच घड्याळ तेच वेळ नवी अशी भूमिका आपण घेतली आहे. सत्तेत गेल्यानंतर आम्ही महत्त्वाची खाती घेण्याचा प्रयत्न केला आहे. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करायचा असतो

कामाच्या बाबतीत तुम्ही काळजीच करु नका आपलं नाणं खणखणीत आहे. लोकशाहीत काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो, आम्ही आमच्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगत होतो. काहींनी ऐकलं काहींनी नाही ऐकलं. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली. इथून पुढच्या काळातही राजकीय भूमिका तुमच्यासमोर मांडत असताना शाहू, फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. प्रत्येक पक्षाला त्या त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून तसा निर्णय घ्यावा लागतो. मागे नितीश कुमार, ममता बॅनर्जी, जयललिता यांनीही भूमिका घेतल्या होत्या. आपल्या राज्यानेही १९७८ पासून वेगवेगळ्या राजकीय भूमिका कशा घेतल्या गेल्या हे पाहिलं त्यामुळे राजकीय युती ही राजकीय परिस्थितीनुसार घ्यावी लागते. यातून एकही पक्ष सुटलेला नाही. हातावर हात ठेवून फक्त विरोध करत राहणं ही आपल्या पक्षाची भूमिका नाही. असंही अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar explains why he decide to left sharad pawar and alliance with shinde fadnavis government scj