राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सध्या सुरू असलेला शिवसेनेतील बंड आणि राज्यातील राजकीय स्थिती यावर बोलताना मोठं विधान केलं आहे. “एकनाथ शिंदे यांच्यामागे कुणती तरी मोठी शक्ती आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे बंड करण्यापर्यंत धाडस करणार नाही,” असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे आमदार एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ खडसे म्हणाले, “सध्या राज्यात जे राजकारण चाललं आहे तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं दिसत असले. असं असलं तरी यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळं घडतंय, असं म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईलच. गेल्या ४० वर्षात असं राजकारण मी अनुभवलं नव्हतं. राज्यात अस्थिरतेचं वातावरण आहे.”

“महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केलंय”

“कोण कुणाबरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केलंय. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेन अशी स्थिती आहे. यामध्ये असं चित्र दिसतंय की, एकनाथ शिंदे यांचं बंड म्हणा किंवा त्यांनी जो निर्णय घेतलाय तो त्या निर्णयनुसार या तांत्रिक बाबींची सोडवणूक झाल्याशिवाय प्रश्न निकाली निघणार नाही,” असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.

पाहा व्हिडीओ –

“राहते घरं १० दिवसात खाली करण्याची नोटीस, नाथा भाऊने असा काय गुन्हा केला”

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले, एक रुपया ठेवला नाही. पहिलं खातं गोठवलं, आता पैसे काढून टाकले. त्यानंतर राहते घरं १० दिवसात खाली करण्याची नोटीस आली. नाथा भाऊने असा काय गुन्हा केला. न्यायालयात जाऊन स्टे आणला म्हणून त्या घरात राहतोय. असं खालच्या स्तराचं राजकारण अनुभवलं नव्हतं.”

“माझ्या हातात इतकी शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो”

“असं करायचं असतं, तर मला अनेकांना छळता आलं असतं. माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. दुर्दैवाने असा विचार मी करत नाही. दुसऱ्यांना सहकार्याची भूमिका असते. न्यायालयाने संरक्षण दिलं म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहोत. नाही तर संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली, मदत केली, नाही तर नाथाभाऊ होत्याच नव्हता झाला असता,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “एकनाथ खडसेंना ६ मतं भाजपातून मिळणार”; राष्ट्रवादीच्या दाव्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खडसेंनी ४० वर्षे…”

“मला कधीही बोलवा, मी येईन”; खडसेंचं कल्याणकरांना आश्वासन

“माझ्यामागे जी शक्ती आहे, जी ताकद आहे ती तुमची आहे. मला सर्वोच्च स्थानापर्यंत पोचविण्याचं काम तुम्ही केलंय. मी राज्याचा आमदार आहे. कधीही मला बोलवा, मी येईन. येत्या काही महिन्यात महिन्यातून एकदा एक दिवस कल्याणमध्ये तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी असेन,” असंही एकनाथ खडसे यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse big statement on rebel of eknath shinde in shivsena pbs