जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना बरोबर घेत पक्षाविरोधात दंड थोपटले. या आमदारांना विश्वासात घेऊन शिंदे यांनी वेगळा गट बनवला. या गटाने भाजपाबरोबर राज्यात सत्तास्थापन केली. तसेच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पाठोपाठ शिंदेंच्या गटाने मूळ शिवसेना पक्षावर दावा केला आणि निवडणूक आयोगाने शिंदेंच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. तसेच पक्षाचं अधिकृत चिन्हदेखील त्यांनाच बहाल केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. एकनाथ शिंदे बंडखोरी करून सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. दरम्यान, ते आणि त्यांच्याबरोबरचे आमदार सुरतमध्ये असताना नेमकं काय घडलं होतं. पडद्यामागे कोणत्या हालचाली केल्या जात होत्या यावर शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली होती. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, शिवसेनेत बंड करून तुम्ही गुजरातमधील सुरत शहरात गेलात तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला फोन करून परत बोलावलं होतं, तुम्ही तिथल्या चहाच्या टपरीवरून त्यांच्याशी बोललात? अशा बातम्या अलिकडे पाहायला मिळाल्या होत्या. त्याबद्दल काय सांगाल, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? यावर एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही मुंबईवरून बोलत आणि जाहीरपणे गेलो. आम्ही काही लपून छपून गेलो नाही. बोलत गेलो… खुलेआम… जाहीरपणे गेलो. राहीला प्रश्न परत बोलावण्याचा तर, एकीकडे आम्हाला परत बोलवायचं आणि दुसऱ्या बाजूला आमचे पुतळे जाळायचे, आमची पक्षातून हकालपट्टी करायची, असा सगळा प्रकार चालू होता. त्याचवेळी भाजपाच्या नेतृत्वाशी फोनवरून चर्चादेखील केली जात होती. ते (उद्धव ठाकरे) भाजपा नेतृत्वाला म्हणाले, तुम्ही यांना (आम्हाला) कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्याबरोबर येतो. परंतु, भाजपा नेतृत्वाने तुम्हाला (ठाकरे गट) त्यांच्याबरोबर घेण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का? आम्ही गेल्यावर तुमच्याकडे काय राहिलंय?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसैनिकांचं खुलेआम खच्चीकरण केलं जात होतं. हे खच्चीकरण थांबवण्यासाठी, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, आमचा धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हे (बंडखोरी) पाऊल उचललं. हे पाऊल टोकाचं होतं, धाडसाचं होतं, परंतु आम्ही ते पाऊल उचललं. त्यासाठी हिंमत लागते जी आम्ही दाखवली.

हे ही वाचा >> “नकली शिवसेनेचा बोलघेवडा नेता पंतप्रधानपदाबाबत म्हणाला…”, नरेंद्र मोदींची संजय राऊतांवर टीका

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही भाजपाबरोबर जाऊन खूश आहात का? त्यावर शिंदे म्हणाले, आमची भाजपाबरोबर अनेक वर्षांपासून वैचारिक युती होती. ही युती शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या सर्वांच्या प्रयत्नांमुळे झाली होती. तीच युती आम्ही केली. ही युती उद्धव ठाकरे यांनी तोडली होती. त्यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त केली. आम्ही शिवसेना आणि भाजपाची वैचारिक युती पुन्हा केली. त्यामुळे नाराजीचा, नाखुशीचा प्रश्नच येत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde claims uddhav thackeray offers bjp leadership will come with you asc