आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. आत्तापर्यंत जे काही झालं ते झालं. आता मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करतो आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. सोमवारपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण यांनी सोमवारीच आपल्या आमदारकीचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेशाबाबत भाष्य केलं नव्हतं. आज अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आलं आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदं ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करत आहेत. मी सर्वात आधी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती यांना अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आहे त्यावर सही करुन त्यांना भाजपात प्रवेश द्यावा. “

अशोक चव्हाण यांची कारकीर्द कशी आहे?

अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. शंकरराव चव्हाण यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यांचे सुपुत्र म्हणून शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा सांभाळण्याच्या अशोक चव्हाण यांनी त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केला. वडील आणि मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचं शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचं एकमेव उदाहरण आहे.

२८ ऑक्टोबर १९५८ या दिवशी अशोक चव्हाण यांचा जन्म मुंबईत झाला. विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी एमबीए केलं. १९८५ मध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे चेअरमन झाले. तिथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. प्रकाश आंबेडकर यांचा जेव्हा त्यांनी निवडणुकीत पराभव केला तेव्हा अशोक चव्हाण हे अवघ्या ३० वर्षांचे होते. १९८७ ते १९८९ या कालावधीत ते खासदार होते. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. १९८६ ते १९९५ या कालावधीत अशोक चव्हाण हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. १९९९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनली आहे. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहिला.

हे पण वाचा- “अशोक चव्हाणांनी भाजपात जाणं हा काँग्रेससाठी ‘वेक अप कॉल’ आहे पण ते..”, बाबा सिद्दीकींची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण आणि आदर्श घोटाळा

शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात विविध खाती सांभाळल्यानंतर २००८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. २६/११ चा हल्ला २००८ मध्येच झाला होता. त्यावेळी ताज हॉटेलमध्ये विलासराव देशमुख हे रामगोपाल वर्माला घेऊन गेले होते. ही बाब काँग्रेस हायकमांडला मुळीच पटली नाही. त्यामुळे विलासरावांना खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद मिळालं. त्यांची कामगिरी उत्तम प्रकारे सुरु होती. मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशोकपर्व नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज देऊन तो खर्च निवडणूक खर्चात दाखवल्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर झाला. तसंच कारगील युद्धातील विधवांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात नातेवाईकांना आणि आप्तस्वकियांना घरं दिल्याच्या प्रकरणात अशोक चव्हाण यांचं नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former maharashtra cm ashok chavan joins bjp with present of devendra fadnavis scj