हिंगोली : हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी स्वातंत्र्य दिनी हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी झेंडे घेऊन देण्यासाठी दूरध्वनी केल्याचा गंभीर आरोप आरापे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दूरध्वनी स्वीकारला नाही म्हणूनही जिल्हाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वरिष्ठ नेते येत असल्याचे सांगत लागणारा सर्व खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करुन घेतला असल्याच्या आरोपामुळे महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान या आरोपात काही तथ्य नाही. शासनाकडूनच ध्वज पुरविण्यात येणार होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील गेल्या वर्षीचे दोन हजार तिरंगी ध्वज उपलब्ध करुन दिले. आपले पाप झाकण्यासाठी आमदार बांगर बेछूट आरोप करू लागले असल्याचे घुगे म्हणाले.

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मेघना बोर्डीकर यांच्या बैठकीत जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आरेरावी बरोबर शासकीय यंत्रणांकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष कोणत्याही कारणासाठी पैसे मागत आहेत. अगदी ग्रामसेवकापासून ते स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत रक्कम मागितली जात आहे. मुख्यमंत्री आमचे आहेत, असा धमकीवजा सूर वापरला जात असल्याचाही बांगर यांचा आरोप आहे. थेट शिवसेनेच्या शिंदे गटाच्याा आमदारांनी भाजप जिल्हाध्यक्षाची तक्रार केल्याने महायुतीमधील मतभेत पुढे आले आहेत. या सर्व घटनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचेही बांगर यांनी म्हटले आहे. तर घुगे यांनीही बांगर यांच्यावर पलटवार केला. कोण कशी संपत्ती कमावते आहे सर्वाना माहीत आहे. माझे काही मटक्याचे, गुटख्याचे व्यवहार नाहीत. संपत्ती गोळा करणारे कोण आहेत, हेही सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात बांगर यांचा समाचार घेतला.

हिंगोली जिल्ह्यात भाजप – शिवसेनेतील मतभेदामुळे प्रमुख पक्षाचे नेते अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करत असल्याचा गंभीर आरोप चव्हाट्यावर आला आहे. हर घर तिरंगा हा शासनाचा कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दोन हजार तर हिंगोली नगरपालिकेने १२०० झेंडे दिले. त्यामुळे झेड्यांसाठी अधिकाऱ्यांना पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण घुगे यांनी दिले आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांनी पहिल्यांदाच भाजपच्या नेत्यावर आरोप केले आहेत. दरम्यान हिंगोलीतील अवैध धंदे हे बांगर यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचेही भाजपने म्हटले आहे. त्यामुळे हिंगोलीतील आरोपामुळे सत्ताधारी गटातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे.