मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह परिसरातील कमाल तापमानात ५ अंशाने वाढ झाली. मात्र सोमवारपासून पुन्हा तापमानात हळूहळू घट होऊन कमाल तापमान २८ ते ३० अंशापर्यंत आणि किमान तापमान १८ ते २० अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रात गारवा कायम राहून राज्यात पुढील ४ ते ५ दिवस सौम्य थंडी जाणवण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हिवाळा आणि पावसाळा दोन्ही एकाच वेळी येणार असल्याने मिश्र वातावरणाची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवडय़ात कडाक्याची थंडी पडल्यानंतर तापमानात वाढ झाली. त्यामुळे उष्ण झळा नागरिकांना सोसाव्या लागत होत्या. आता पुन्हा तापमानात किंचितशी घट होऊन कमाल तापमान २८ अंश आणि किमान तापमान १८ अंशापर्यंत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, किमान तापमानात घट आणि कमाल तापमानात वाढ होत असून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणसदृश परिस्थिती तयार झाली आहे. रविवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ हवामानाची नोंद झाली. नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबादसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

काही शहरातील किमान तापमान

(अंश सेल्सियसमध्ये)

* औरंगाबाद – १०.९

* बारामती – ११.४

* पुणे – १२.२ 

* नाशिक – १२.६

*  सातारा – १२.९ 

* महाबळेश्वर – १४.२ 

* जळगाव – १४.५ 

* गडचिरोली – १४.८ 

* उस्मानाबाद – १५.४

*   परभणी – १५.६ 

* नागपूर – १५.७

*  नांदेड – १५.८

*  माथेरान – १६

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd forecasts unseasonal rains in maharashtra mumbai print news zws