सावंतवाडी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवासी संघटनेने कोकण रेल्वे, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे विशेष गाड्यांची मागणी केली आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असल्याने १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दररोज किमान ८ अप आणि ८ डाऊन अशा नवीन विशेष गणपती रेल्वे सोडाव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच, या कालावधीत कोकण रेल्वेवरील मालवाहतूक पूर्णपणे बंद करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.
प्रवासी संघटनेच्या प्रमुख मागण्या:
जादा रेल्वे फेऱ्या: गणेश चतुर्थीपूर्वी, म्हणजे २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान, मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या (डाऊन मार्गावर) अधिक रेल्वे सोडाव्यात. गौरी-गणपती विसर्जन २ सप्टेंबरला असल्याने, ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या (अप मार्गावर) जादा गणपती स्पेशल सोडाव्यात.
प्रवासाचे नियोजन: मुंबई ते मडगाव दरम्यानच्या १८ ते २० तासांच्या प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी, परतीच्या प्रवासातील (अप मार्गावरील) सर्व जादा रेल्वे गणपतीच्या काळात मडगाव-मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात.
रेल्वेची उपलब्धता आणि माहिती: सर्व अनारक्षित रेल्वे गणपतीपूर्वी एक महिना आधी जाहीर कराव्यात, जेणेकरून चाकरमान्यांना वेळेत माहिती मिळेल.
प्रस्थान स्थानके: चाकरमान्यांची जास्त वस्ती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरांमध्ये असल्याने, जादा रेल्वे पनवेलऐवजी CSMT, दादर, कुर्ला, दिवा, वांद्रे, वसई आणि वलसाड येथून सोडाव्यात.
डब्यांची संख्या वाढवा: मेमू रेल्वे सध्याच्या १२ डब्यांऐवजी २२/२४ डब्यांच्या चालवाव्यात. तसेच, ११००३/०४ तुतारी एक्सप्रेस २४ डब्यांची चालवावी.
मालवाहतूक बंद करा: गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेवरील कंटेनर वाहतूक (मालगाड्या) पूर्णपणे बंद करावी किंवा त्या पनवेल-मिरज मार्गे मडगावला वळवाव्यात.
अतिरिक्त थांबे: नेहमीच्या सुपरफास्ट एक्सप्रेसना कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जादा थांबे द्यावेत.नवीन मेमू सेवा: दिवा-रोहा मेमूचा विस्तार न करता, मुंबई ते चिपळूण/खेड दरम्यान नवीन मेमू रेल्वे चालवाव्यात. पुणे-सावंतवाडी रेल्वे: कल्याणमार्गे पुणे ते सावंतवाडी दरम्यान रेल्वे चालवाव्यात.
पश्चिम रेल्वेवरून सेवा: पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, वसई रोड, अहमदाबाद, उधना येथूनही कोकणाकडे रेल्वे चालवाव्यात. डबल डेकर रेल्वे: मुंबई ते रत्नागिरी दरम्यान अनारक्षित डबल डेकर रेल्वे चालवाव्यात.गणपती स्पेशलचा मार्ग: गणपती स्पेशल रेल्वे कर्नाटक/केरळपर्यंत न सोडता त्या मुंबई ते सावंतवाडी/मडगाव दरम्यानच चालवाव्यात.
प्रवाशांच्या मागणीचे कारण:
दरवर्षी गणेशोत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. सध्या कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्यांची संख्या कमी असल्याने गणेशभक्तांच्या तुलनेत त्या अपुऱ्या पडतात. यामुळे यावर्षी कोकणाला गणपतीसाठी साधारणपणे ५०० जादा फेऱ्यांची आवश्यकता असल्याचे प्रवासी संघटनेने म्हटले आहे. गेल्या वर्षी अनारक्षित रेल्वे उशिराने जाहीर केल्याने त्याची माहिती चाकरमान्यांपर्यंत पोहोचली नाही आणि परिणामी त्या रिकाम्या धावत होत्या, असेही संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
या मागण्यांचे निवेदन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोषकुमार झा, मध्य व पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर, तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांना पाठवण्यात आले आहे. या निवेदनावर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री. शेखर बागवे आणि सेक्रेटरी श्री. यशवंत जडयार यांच्या सह्या आहेत.