गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात सर्वकाही आलबेल नाही, असं चित्र सध्या राज्यात आहे. शिंदे गटाने अलीकडेच कथित जाहिरातबाजी करत भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर संबंधित जाहिरात आम्ही दिलीच नाही, असं म्हणत शिंदे गटाने घुमजाव केला. पण दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाने अन्य एक जाहिरात देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी भाजपा आणि शिंदे गटातील वादावरून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गट- भाजपा वादावर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पार्टीने सत्ता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासमोर गुडघे टेकवले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सर्व नेते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा आग्रह करतील, अशी मोठी भविष्यवाणी जयंत पाटील यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. येत्या काळात आपल्याला हळूहळू सगळं समजेल, असंही जयंत पाटील म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “वादावर पडदा पडण्याचा प्रश्नच नाही, आम्ही…”; खासदार श्रीकांत शिंदेंचं जाहिरात वादावर वक्तव्य, म्हणाले…

शिंदे गट-भाजपातील अंतर्गत कलहावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, “हे आगतिकतेनं एकत्रित आलेले लोक आहेत. भाजपाने सत्ता टिकवण्यासाठी शरणागती पत्करुन असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर गुडघे टेकले आहेत. तसेच एकनाथ शिंदेंसाठी एकप्रकारे अदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनाही नाइलाजाने यात राहावं लागत आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे गटात असे थोडेफार वाद होतील. कदाचित शिंदे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढायला कुणीच उभं राहणार नाही. सगळेच कमळाच्या चिन्हावर उभं राहण्याचा आग्रह करतील. लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. आपल्याला हळूहळू सर्व कळेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil statement on eknath shinde and bjp dispute rmm