राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने लहान मुलीवर अनेक वर्षे बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केले आहेत. “असा घटनांमुळे सत्ताधारी बदनाम होत आहेत हे सरकारला कसं कळत नाही?” असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. राष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी (४ ऑक्टोबर) डोंबिवली शहरातील इंदीरा चौक परिसरात वाढत्या गुन्हेगारी विरोधात व त्याला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण डोंबिवलीत एका केबल व्यावसायिकाने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्याने सुसाईड नोटमध्ये एका भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव लिहिलं. त्यानंतर या आत्महत्येला राजकीय वळण लागलं आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.

यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “संदिप माळीच नाही, तर एकंदरच गुंडांना अभय मिळतंय, पोलीस संरक्षण मिळत आहे. गुंड दहशत माजवत आहेत. त्यामुळे सत्ताधारी बदनाम होत आहेत. हे सरकारला कसं कळत नाही? या संदिप माळीने अनेक वर्षे लहान मुलीवर बलात्कार केला. अजूनही त्याचे चाळे चालूच आहेत.”

“आत्महत्येच्या पत्रात नाव, तरीही आरोपीवर कारवाई नाही”

“आमच्या भगिनीच्या पतीने आत्महत्या केली. आत्महत्येच्या पत्रात त्याचं नाव लिहिलं आहे, तरीही कारवाई नाही. त्याच्याविरोधात २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. असं असतानाही संदिप माळीवर तडीपारीची कारवाई नाही. डोंबिवली हे सुसंस्कृत, बुद्धिवंत, साहित्यिक, ज्ञानाचा महासागर असं शहर आहे. त्या शहरात अशाप्रकारच्या गोष्टी होणं शहराची बदनामी करणारं आहे,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो”, ३.५ ट्रिलियन जीडीपीवरून जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल

“कुठलंही शहर पोलीस चालवू शकत नाही”

“कुठलंही शहर पोलीस चालवू शकत नाही. हिटलरने स्वतःची गेस्टॅपो आणि एसएस आर्मी स्थापन केली. ती त्याची वैयक्तिक पोलीस आणि आर्मी यंत्रणा होती. तीही टिकू शकली नाही,” असंही आव्हाडांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad made serious allegation on bjp leader of raping minor girl rno news pbs