Mumbai Marathi News Live Updates : महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. अशातच काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात कितीजण मृत्यूमुखी पडले? त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की चेंगराचेंगरीत? असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारले. तसेच त्यांनी एक व्हिडीओसुद्धा ट्वीट केला. दरम्यान, यावरून आज पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
याबरोबरच गेल्या काही दिवसांत राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण होते. मात्र, आता बहुतांश भागात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांच्यावर गेलं आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
याशिवाय राज्यातील इतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
Mumbai Pune News Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ४३४ अनधिकृत होर्डिंग, धोरणाची अंमलबजावणी प्रलंबित
भाजपाकडे अजित पवारांच्या पक्षप्रवेशाबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या नेतृत्वावर कोण प्रश्न चिन्ह उपस्थित करतंय हे त्यांनीच तपासलं पाहिजे. आमच्याकडे अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. अजित पवारांची कुठेही भाजपाला संपर्क केला नाही. दोन वर्षांपासून त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठाकरे पवारांच्या भेटीनंतरच या चर्चांना उधाणं आलं, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
मुंबईः माहीम परिसरात बुधवारी पहाटे प्लास्टिकच्या पिशवीत दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नागपूर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचे प्रियकराने अपहरण करून गळा आवळून खून केला. गळफास घेतल्याचा बनाव करीत मृतदेह जंगलात फेकून दिला. मात्र, पोलिसांनी हत्याकाडाचा छडा लावत प्रियकर-प्रेयसीसह चौघांना अटक केली.
अमरावती : शहरात ‘ब्रॅण्डेड’ कंपन्यांच्या नावावर बनावट घड्याळी विक्री करण्याचा प्रकार खोलापुरी गेट पोलीस व संबंधित कंपनीच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला. जवाहर गेट परिसरातील शनि मंदिराजवळ असलेल्या डायमंड वॉच या प्रतिष्ठानावर छापा टाकून पथकाने ६ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदेंसह मुनगंटीवरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असेही ते म्हणाले.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण म्हणजे देविका. यात देविका हे पात्र अभिनेत्री राधिका देशपांडे साकारत आहे. नुकतंच राधिकाने सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर संताप व्यक्त केला आहे.
गडचिरोली : केंद्रवर्ती निधीतून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेच्या माध्यमातून आदिवासी लाभार्थ्यांना व्यवसायासाठी दुभत्या गायी वाटप योजनेमध्ये मोठा घोळ समोर आला असून, गायी घेण्यासाठी खात्यात आलेले तब्बल २० लाख इतर खात्यात वळवण्यात आले. हा व्यवहार अशिक्षित आदिवासींची दिशाभूल करून त्यांचे अंगठ्याचे ठसे घेऊन करण्यात आला आहे.
नागपूर : परिवहन खात्याने राज्यभऱ्यातील विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या ‘हेल्मेट सक्ती’साठी नवीन क्लृप्ती शोधली आहे. त्यानुसार दुचाकीने विना हेल्मेट महाविद्यालयात आलेला विद्यार्थी आणि शासकीय कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, अशी स्पष्टोक्ती दिली. दरम्यान, यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपावर टीकास्र सोडलं आहे. अजित पवारांविरोधात वावड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपानेच केलंय, असं ते म्हणाले. ठाकरे गटाने मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून ही टीका करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात तब्बल ४३४ अनधिकृत होर्डिंग असून याचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. आतापर्यंत महापालिकेने अवघ्या १२७ बेकायदा होर्डिंगवर कारवाई केली. पिंपरी महापालिकेने तयार केलेले होर्डिंग धोरण शासनाने रद्द केले. त्याऐवजी राज्य शासनाने ९ मे २०२२ रोजी सर्वच महापालिकांसाठी धोरण केले. त्याला एक वर्ष पूर्ण होत आले, तरी पिंपरी महापालिकेकडून या धोरणाची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही.