Maharashtra Political Crisis Updates, 21 November 2022 : राहुल गांधींनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती, असा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली,” असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.
तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा मुद्दाही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Marathi News , 21 November 2022 : पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा दोन अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू; सातजण जखमी
शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी टिकली लावली नसल्याने एका महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता. संभाजी भिडेंनी यावेळी केलेल्या विधानानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं असून, त्यावर टीका होत आहे. भाजपाच्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला असून, टीका केली आहे.
श्रद्धा वालकर खून प्रकरण समोर आल्यानंतर क्रौर्याची सीमा गाठणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये एका व्यक्तीने पत्नीचा खून करुन तिचे दोन तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला संपवल्यानंतर तिच्या अवयवाचे तुकडे आरोपीने जंगलातील विविध भागांमध्ये पुरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावर टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले आहे. नवले पुलाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत सात ते आठजण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, हे तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्या विधानाचे समर्थन केले होते. दरम्यान, यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांकडून सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का? असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना विचारला आहे. सविस्तर वाचा –
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केलीय. खैरेंनी सत्तारांना हिरवा साप म्हणत त्यांना एकदा माईकने मारणार होतो, असं चंद्रकांत खैरेंनी सांगितलं. तसेच अब्दुल सत्तार संभाजीनगर कधीच म्हणत नाही, नेहमी औरंगाबाद असंच म्हणतात, असाही आरोप केला. ते औरंगाबादमध्ये एका सभेत बोलत होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम असताना दुसरीकडे भाजपा मात्र आक्रमकपणे त्यांना लक्ष्य करत आहे. शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचं सांगत, यामुळे मविआत फूट पडू शकते असा इशारा दिला आहे. त्यातच आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांसंबंधी एक ट्विट केलं आहे. या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेला ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्प’ पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आकस्मिक निधीला हात घातला आहे. या प्रकल्पासाठी १७०५ कोटींचा खर्च येणार आहे. त्यापैकी २५० कोटींचा खर्च आकस्मिक निधीतून करण्यात येणार आहे. हा प्रकार ‘ऋण काढून सण साजरा’ करण्याचा आहे, अशी टीका पालिका प्रशासनावर होत आहे. सविस्तर वाचा –
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रविवारी रात्री नऊच्या सुमारास भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री आणखी दोन अपघात झाले. बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ मध्यरात्री टेम्पोने सात वाहनांना धडक दिली, तर अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.