Mumbai Maharashtra News Today, 12 July 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून हा पक्ष देशभर चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘कलंक’ म्हटलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. भाजपा नेते यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. तर भाजपा कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आज दिवसभरात या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया येतील. यासह मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांमध्ये होणारं खातेवाटप, आमदारांमधील नाराजी यासंबंधीच्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.
Mumbai Maharashtra Live News Updates
पुणे: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) एनडीए (चांदणी) चौकात उभारण्यात येत असलेल्या नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्टला करण्यात येणार आहे.
वर्धा, अकोला येथे रेल्वे वाहतूक पावसाने ठप्प पडली होती. त्यावेळी सींदी रेल्वे स्थानकावर शालिमार एक्स्प्रेस उभी ठेवण्यात आली होती. मात्र वाहतूक सुरळीत होण्यास विलंब लागण्याची चिन्हे दिसू लागली.
चंद्रपूर: रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख तालुक्याच्या मारलेश्वर देवस्थानातील हा व्हिडिओ आहे. एक माकड आपल्याला चक्क बिसलरीतील पाणी पितांना दिसत आहे.
नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘कलंक’ हा शब्द वापरला आणि एका रात्री तो सर्व प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांच्या तोंडचा परवलीचा शब्द झाला. दोन दिवसांत कोण कोणासाठी कसा कलंक आहे हे सांगण्याची जणू स्पर्धाच लागली.
ठाणे : राज्य शासनाने ठाण्यातील रस्त्यांसाठी ६५० कोटी दिले, पण अधिकारी आणि ठेकेदारांचे आर्थिक लागेबांधे असल्याने रस्ते खड्ड्यात गेले, असा गंभीर आरोप भाजपा आमदार संजय केळकर यांनी केला आहे. खड्ड्यांचा नाहक फटका करदात्या ठाणेकरांना बसत असल्याने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागपूर : राज्य वीज नियामक आयोगाकडून मंजूर मेरिट ऑर्डर डिस्पॅचनुसार (एमओडी) सध्या राज्यात महानिर्मितीच्या खापरखेडा प्रकल्पातील एका संचातून सर्वात स्वस्त म्हणजे २.८० रु. प्रतियुनिट तर उरण प्रकल्पातील एका संचातून ७.१५ रुपये प्रतियुनिट वीज निर्मित होत आहे.
नागपूर : मोठ्या शहरातील रस्ते असो की राज्य व राष्ट्रीय महामार्ग असो. प्रत्येक रस्त्यांवर दुभाजक हा असतोच. या दुभाजकावर विविध प्रकारची मात्र विशिष्ट उंचीचीच झाडे लावली जातात. रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुभाजक तयार केला जातो. मात्र, यावर झाडेच का लावली जातात याचा कधी विचार केला आहे का?
अमरावती : एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पश्चिम विदर्भातही शिवसेनेत खिंडार पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दोन खासदार, तीन आमदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाच्या पुनर्बांधणीचे त्यांचे प्रयत्न आहेत.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता असून दोन नगरसेवकांनी आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून अजित पवार यांच्या गटात असल्याचे जाहीर केले आहे. यातच महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतल्याने संशयकोळ निर्माण झाला असताना सोमवारी महापौरांच्या दालनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा लावण्यावरून वादंग पाहण्यास मिळाला.
सविस्तर वाचा…
सर्वोच्च न्यायालयाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सुनावणी मंगळवारी १४ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलताना, भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ला या प्रकरणी चौकशी पूर्ण करण्याला आणखी वेळ मिळवून दिली.
पुणे: नर्तिकेच्या घरातून १३ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून पसार झालेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले. आरोपीकडून १२ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
पुणे: यंदा जिल्ह्यात मोसमी पावसाला विलंबाने सुरुवात झाली. घाटमाथावगळता इतरत्र ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे.
मुंबईः खेळण्याच्या बहाण्याने १० वर्षांच्या मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे की, “फडणवीस म्हणाले, ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला त्यांच्यासोबत पंक्तीला बसून खाणे हा कलंक आहे.’ फडणवीस यांनी स्वतःच्या मनाची व्यथा अशा प्रकारे व्यक्त केलेली दिसते. आता कोण कोणाच्या पंक्तीला बसून काय खात आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. हा शेण खाण्याचा कलंकित प्रकार फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर देशभर सुरू आहे व त्यात महाराष्ट्र सर्वाधिक कलंकित होत आहे. आम्ही विदर्भाच्या दौऱ्यात सांगितले, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला कलंकित केले. हा कलंक-बाण त्यांच्या भक्तमंडळाच्या काळजात घुसला व त्यांनी त्यावर थयथयाट सुरू केला. ही कलंकित नाचेगिरी गेल्या काही काळापासून महाराष्ट्र सहन करतोय”, असा घणाघातही ठाकरे गटाने केला आहे.
“…हा कलंकच, याला मर्दानगी म्हणता येत नाही”, ठाकरे गटाची देवेंद्र फडणवीसांवर टीका
शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा ‘कलंक’ या उल्लेखाचं समर्थन केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, “सत्य असे की, महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणायचे काम फडणवीसांनी केले. त्यांचे मास्टर स्ट्रोक म्हणजे काय? हाताशी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून हे मास्टर स्ट्रोक. ज्या दिवशी दिल्लीची सत्ता जाईल त्याक्षणी या मास्टर स्ट्रोकचे काय होईल? यंत्रणांची दहशत माजवून चाणक्यगिरी चालली आहे. याला मर्दानगी म्हणता येत नाही. हा कलंकच आहे. फडणवीस म्हणतात, ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचे आरोप केले त्यांच्या पंक्तीला बसणे हे बरे आहे काय?’ देवेंद्रजी, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर बरे होईल. शिंदे-मिंधे गटातील आमदार, खासदारांचे हात व तोंड शेणाने बरबटले आहेच. कुणाकुणाची नावे घ्यायची? आता अजित पवारांचे चक्की पिसिंग, हसन मुश्रीफांचा घोटाळा, भुजबळ – हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे. या शेणास तुम्ही नागपूरची बासुंदी म्हणत असाल तर या आजारावर एखादा उपचार करूनच घ्या. स्वतः शेण खायचे व दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घ्यायचा असे एकंदरीत तुमचे धोरण दिसते”, असा हल्लाबोलही करण्यात आला.