Maharashtra Pre-Monsoon Rain Warning : ऐन उन्हाळ्यात मुंबई, पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस चालू आहे. मंगळवारी (२१ मे) अवकाळी पावसाने पुणेकरांची तारांबळ उडवली. दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळनंतर आणखी वाढला. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घडना घडल्या. पावसामुळे पुण्यात सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. तर, पुणे-बंगळुरू महामार्गाला नदीचं स्वरुप आलं आहे. तसेच सांगली व कराडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. सांगली, मिरजेतील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांची त्रेधा उडाली आहे, तर ग्रामीण भागात पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, धाराशिव, अकोला व रायगडसह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर, वादळी वाऱ्याचा पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन
गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि २३ मेपर्यंत देण्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या इशाऱ्यामुळे उन्हाळी भात, भुईमूग, परिपक्व फळे व भाजीपाल्याचे नुकसान होवू नये या दृष्टीने लवकरात लवकर पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्याचे आवाहन कृषी विभागाने दिले आहे.
पुढील काही दिवस राज्याला मान्सूनपूर्व पावसाचा इशारा
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर केळी, डाळी व कांद्याची पिकं जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून त्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्याला मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई व ठाण्याला यल्लो अलर्ट तर पुणे व कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगलीलाही यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्याला अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह (४० ते ५० किमी प्रतितास वेग) मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनाऱ्यापासून जवळ राहणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.