महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं सुरू आहेत. तालुक्यांमध्ये-जिल्ह्यांमध्ये बंद पाळणे, आमदारांच्या गाड्या अडवणे, नेत्यांना घेराव घालणे आणि वाहनांची जाळपोळ करण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत. ही जाळपोळ मराठा समाजाकडून होत नसून यामागे दुसरेच कुणीतरी असल्याची शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. तर आज, धाराशिवमधील उमरगा येथे कर्नाटकातील बस जाळण्याचा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील सर्व आगारांनी मंगळवारी प्रवासी सेवा बंद ठेवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातलं मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळल्यानंतर जालन्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातूनच आपल्या आंदोलनाची सुरुवात केली होती. जालन्यातील नागरिकांच्या मोबाइलवर “शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, सेवा पुन्हा सुरळीत होताच आम्ही तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती देऊ”, असे संदेश मोबाइल कंपन्यांनी पाठवले आहेत. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, इंटरनेट सेवा बंद करण्याशिवाय शिंदे सरकारला दुसरं काही काम आहे का? हे असे बांगड्या भरल्यासारखे चाळे करायचे… यांना बांगड्या दिल्या पाहिजेत… हे लोक मर्दासारखं सरकार चालवत नाहीत… आतून काड्या करतात. कुठं नेट बंद कर.. कुठं अजून काहीतरी बंद कर..असं करून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, तुम्ही जातीविरोधात मैदानात उतरलात तरी हे मराठ्यांचं आंदोलन आहे लक्षात ठेवा. हे आंदोलन आता थांबणार नाही.

आक्रमक आंदोलन करणाऱ्यांना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे. तुमचं आंदोलन तुम्ही वेगळं करा. तर सरकारला उद्देशून मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर, त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतो. पण हा भाऊ सारखा दांडकं घेऊन आमच्याकडे येणार असेल तर आम्हालासुद्धा आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील. मग त्याला हे सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) याला जबाबदार असतील. त्यातला एक उपमुख्यमंत्री जास्त जबाबदार असेल. कारण, त्यालाच अशा काड्या करायची लई सवय आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation manoj jarange patil says dy cm misleading protest by spreading led astray asc