कराड : पुणे- बंगळुरू महामार्गावरील कराड शहरालगत सहापदरीकरण कामातील उड्डाणपूल व रस्त्याचे रुंदीकरण दीर्घकाळ रेंगाळल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढल्याची बाब गांभीर्याने घेऊन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला महामार्गाच्या कामातील दिरंगाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
कराडलगत महामार्गावरील अपूर्ण कामामुळे वाहनांची गर्दी वाढली असून, काही ठिकाणी गंभीर अपघात. काही अपघातांमध्ये दुर्दैवाने जीवितहानीही झाली आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहणे ही स्थानिक नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे मत डॉ. भोसले यांनी व्यक्त केले.
नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांची डॉ. भोसले यांनी भेट घेतली. त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करत अपघातांचे वाढते प्रमाण, वाहतूक कोंडी आणि कामातील दिरंगाईबाबत चिंता व्यक्त केली. काम सुरू असणे स्वागतार्ह असले तरी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज डॉ. भोसले यांनी व्यक्त केली.
डॉ. भोसले यांनी महामार्गावर सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय म्हणून वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कर्मचारी नेमणे, अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविणे, मार्गदर्शक फलकांची संख्या व स्पष्टता वाढविणे व रात्रीच्या वेळी दृश्यता वाढविण्यासाठी पुरेसे पथदिवे बसविणे आदी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनात आहे.
निवेदनाची गंभीर दखल घेत अमोल पाटील यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित डी. पी. जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून आवश्यक सूचना केल्या. मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्याचे आश्वासनही पाटील यांनी डॉ. भोसले यांना दिले. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी महामार्गावरील वाहतूक व नागरिकांचे जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी हे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्याआधी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
दरम्यान, आजवर खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी प्रभावी नेत्यांनी पुणे- बंगळुरू महामार्गाचे रेंगाळलेले सुसज्जीकरण आणि ठेकेदार कंपनीची मनमानी याविरुध्द आवाज उठवला. संबंधित यंत्रणा, ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांना धारेवर धरले होते. त्यावेळच्या बैठकीतील सूचनांना संबंधितांनी जुमानले नव्हते. त्यामुळे सर्वांच्या भावना तीव्र बनल्या होत्या. अशात स्थानिक आमदार डॉ. अतुल भोसले हे थेट दिल्ली दरबारी धडकल्याने त्याचा प्रभाव किती राहतो, सध्याची ही जटील समस्या सुटते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.