लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान आज संपन्न झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी तब्बल १०३ सभा घेतल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर पक्षाचे नवे नाव, नवे चिन्ह आणि पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणे मोठे कठीण होते मात्र प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांनी ही जबाबदारी लिलया पेलली. दिनांक ८ एप्रिल २०२४ पासून (लोकसभा प्रचार सुरू झाल्यापासून) ते प्रचार संपेपर्यंत त्यांनी तब्बल १०३ जंगी सभा घेतल्या. या सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांव्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठीही घेण्यात आल्या.
आणखी वाचा-सांगली : कॅफेमध्ये अश्लील कृत्यास सहायभूत ठरल्यामुळे चालकास अटक
या सभांमध्ये आमदार पाटील यांनी सरकारने आकारलेल्या अवाजवी करांवर जोरदार प्रहार करत सामान्य जनतेला हा अन्याय समजवून सांगितला. तसेच विविध प्रकल्प, पिकांची निर्यातबंदी यावरून महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाबाबतही त्यांनी या सभांमध्ये भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रभर घेतलेल्या सभा व त्या सभांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षावर केलेल्या टीका टिप्पणीवर जोरदार उत्तर देत असताना त्यांनी भारतीय लोकशाही कशी धोक्यात आहे हेही मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
© The Indian Express (P) Ltd