MNS Avinash Jadhav : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. १३२ जागा मिळवून भाजपा वरचढ ठरली असून शिंदेंच्या सेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही अनुक्रमे ५६ आणि ४० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. पण एवढ्या फुल स्विंगमध्ये महायुतीला मते मिळाल्याने सर्वच विरोधी पक्षांनी आता भाजपावर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. हा ईव्हीएमचाच घोळ असल्याचं सर्व विरोधी पक्षांचं मत आहे. १२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून एकही जागा न पटकावलेल्या मनसेने गेले काही दिवस शांततेची भूमिका घेतली होती. परंतु, आता त्यांनीही त्यांची मौन सोडलं असून मनसेचे अविनाश जाधव यांनी ईव्हीएमवर रोख ठेवला आहे. तसंच, महायुतीने मनसेची फसवणूक केल्याचंही अविनाश जाधव म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आम्हाला मान्यच नाही. कोविड काळात मनसैनिकांनी काम केलंय. जे आमदार कोणाला भेटत नव्हते, कोणाच्या घरी जात नव्हते ते आमदार लाख लाख मतांनी निवडून येतात. आणि मी खात्रीने सांगतो ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती. कारण सरकारकडे पैशांची कमतरता नाहीय”, असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.

“भाजपाचा विजय झाल्याने अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे. हे ईव्हीएममुळे शक्य झालं. एवढं मोठं यश आल्यावर इतर लोकांमध्येही आनंद नाहीय. अनेकांना प्रश्न पडलाय की आमचं मत गेलं कुठे? हे मत ईव्हीएमच्या घशात गेलंय. देशातील १४० कोटी जनतेला कळावं की आपल्या देशात काहीतरी चुकीचं चाललंय”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> शिंदे-फडणवीसांमध्ये मुख्यमंत्री पदावरून अडलं, अजित पवारांची भूमिका काय? राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने स्पष्टच सांगितलं…

तर लोकांनी चपलेने मारलं असतं

“अमेरिकेसारख्या देशात बॅलटवर निवडणुका होत असतील तर इथं काय गरज आहे? हे आम्ही २०१९ लाही म्हणत होतो. आता खात्रीने सांगतो की आमची फसवणूक झालीय. कोर्ट त्यांचं, निवडणूक आयोग त्यांचं. आम्ही कोणाला विचारायचं? शिवेसनेनेच्या प्रकरणात निर्णय आलेला नाही. पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाहीत. सगळं सेट होतं तर मनसे नावापुरती होती. सगळ्या त्यांच्या आल्या असत्या तर लोकांनी चपलेने मारले असते. मनसे एक बहाणा आहे. त्यांना हवाय तो अपेक्षित निर्णय त्यांनी आणलाय”, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election Result Live Updates : महाराष्ट्र सत्तास्थापनेबाबत महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा!

विजयाचं कारण हवं म्हणून लाडकी बहीण योजना आणली

“प्रचारादरम्यान लोक आमदारांना शिव्या देत होते. आमदार कोण हे माहीत नव्हतं. मग अशा लोकांनी डोळे झाकून मतदान केलं असेल का? भाजपाच्या विरोधात लाट आहे, असं वाटत होतं. पण निर्णयानंतर हे सगळं खोटं होतं, हे सिद्ध झालं. त्यांनी फक्त एक पिक्चर तयार केला. लाडकी बहीण योजने आणली गेली. त्यांना कारण पाहिजे होतं ते कारण आणलं गेलं”, असा दावाही अविनाश जाधव यांनी केला.

राज ठाकरे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस

“महायुतीने आमची फसवणूक केली. राज ठाकरे हे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत. जोगेश्वरीची सीट मनसेमुळे आली. जो माणूस मैत्रीमध्ये सगळ्या गोष्टी सोडतो, त्याच्याच पक्षाला पाण्यात पाहता. अपेक्षित आहे की आमच्याबाबतीत काहीतरी चांगला निर्णय होईल. पूर्वइतिहास पाहता ते काही वेगळा निर्णय़ घेतील असं वाटत नाही”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader avinash jadhav target bjp and evm machin over maharahstra assembly election 2024 sgk