महाराष्ट्रात सध्या छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा वाद सुरू आहे. अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नये अशी भूमिका मांडली होती. यावर चांगलाच वाद झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊनही आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असं म्हटलं होतं. मग देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार जे म्हणत आहेत तो एक प्रकारचा द्रोह आहे असंही म्हटलं. तर अजित पवार यांनी यावरही गुन्हे दाखल करा असं ओपन चॅलेंज दिलंय. याच संपूर्ण विषयावर छत्रपती शाहू महाराज यांनी आपली भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापुरुषांविषयी निर्माण होणाऱ्या वादावर काय म्हटलं आहे शाहू महाराजांनी?

महापुरुषांबाबत कुठलेही वाद निर्माण होता कामा नयेत. महापुरूषांविषयी बोलत असताना प्रत्येकाने काळजीपूर्वकच बोललं पाहिजे. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोलताना प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. लोकशाही म्हटल्यावर भिन्न विचार असतात. कुणाच्या दृष्टीकोनातून काही उपाधी दिल्या जातात. त्यातलं आपल्याला योग्य वाटेल तेच आपण घ्यावं इतर गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सामाजिक भान ठेवणं ही प्रत्येकाकडून अपेक्षा आहे. समाज एकसंध कसा राहिल हे आपण पाहिलं पाहिजे असंही छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य त्यांनी केलं आहे.

अजित पवार यांनी काय भूमिका मांडली होती?

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वेळी बोलत असताना अजित पवार यांनी राज्यपालांच्या आणि काही भाजपा नेत्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. राज्यपाल पदी बसलेली व्यक्ती आपल्या राज्यातील आदर्शांचा अपमान कसा काय करू शकते? त्यावर सरकार गप्प का? असंही अजित पवार यांनी विचारलं होतं. तसंच त्याचवेळी संभाजी महाराज यांना धर्मवीर ही उपाधी लावली जाते मात्र ते धर्मवीर कधीच नव्हते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं रयतेचं राज्य म्हणजेच स्वराज्य याचं रक्षण केलं. त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक हेच म्हणणं योग्य आहे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

अजित पवारांच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद

अजित पवारांनी जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. भाजपाने त्यांच्या विरोधात विविध आंदोलनं केली. त्यानंतर शरद पवार यांनीही या प्रकरणी भाष्य करत महापुरूषांवरून वाद निर्माण करू नये असं स्पष्ट केलं. ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणायचं आहे त्यांनी तसं म्हणा, ज्यांना धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी धर्मवीर म्हणावं मात्र वाद निर्माण करू नये. यानंतर अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं तसंच शरद पवार यांनी जी भूमिका मांडली ती देखील मला मान्य आहे आता यावरून राजकारण नको असं सांगितलं.

देवेंद्र फडणवीस विरूद्ध अजित पवार असा सामना

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायला नकोच या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार हे म्हणत असतील हा एक प्रकारचा द्रोह आहे अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर अजित पवार यांनी आज सकाळीच जर हा द्रोह वाटत असेल तर सरकार तुमचं आहे गुन्हे दाखल करा हे प्रत्युत्तरही दिलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुद्द्यावरून दोन नेत्यांमधला कलगीतुराही महाराष्ट्राने पाहिला. आता शाहू महाराज यांनी मात्र महापुरूषांविषयी कुणीही वाद निर्माण करू नये जबाबदारीने वागावं असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No one should disrespect when talking about great men what did shahu maharaj say scj