अलिबाग- रायगड जिल्ह्यात वर्षासहलीसाठी येण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तूमच्यासाठी महत्वाची आहे. पावसाळी सहलीसाठी प्रसिध्द असलेल्या देवकुंड धबधबा आणि सिक्रेट पाँईंट या पर्यटन स्थळांवर पर्यटकासाठी प्रवेश बंदीचे आदेश माणगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी जारी केले आहेत. पुण्यातील कोंडमळा दुर्घटनेनंतर प्रशासनाने हे प्रवेश बंदी आदेश जारी केले आहेत.
पावसाळी पर्यटनासाठी माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा आणि सिक्रेट पॉईंट ही दोन पर्यटन स्थळ प्रसिध्द आहेत. मुंबई, ठाणे, नवी मंबई आणि पुण्यातील हजारो पर्यटक या ठिकाणी पावसाळी येत असतात. मात्र पर्यटकांच्या आततायीपणामुळे या ठिकाणी गेल्या काही वर्षात दुर्घटना घडल्या आहेत. पर्यटकांसाठी येथील सहली जीवघेण्या ठरल्या आहेत. त्यामुळे ही केंद्र ३० सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात तीस हून अधिक पर्यटकांचा पावसाळी सहली दरम्यान मृत्यू झाला आहे. पर्यटकांचा आततायीपणा यास कारणीभूत ठरतो आहे. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परीस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटक यास दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या या दुर्घटना लक्षात घेऊन देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील पावसाळी पर्यटन केंद्रांवर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये ही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान या निर्णयाबाबत स्थानिकही नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे स्थानिकांचे रोजगार बुडत असल्याने त्यांनीही यावर आक्षेप नोंदवला. प्रशासनाने ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
देवकुंड धबधबा परीसरात दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. स्थानिक परिस्थितीचा अंदाज न आल्याने या ठिकाणी पूर्वी पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या होत्या. पण स्थानिकांनी विशेष खबरदारी घेऊन नंतर हा परिसर पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित कसा होईल यासाठी प्रयत्न केले. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट देणे, त्यांना स्थानिक गाईड उपलब्ध करून, ठिकठिकाणी सूचना फलक लावणे यासारखे उपक्रम राबविले. त्यामुळे हा परिसर अधिक सुरक्षित झाला. २०० ते २५० तरुणांना यातून रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे अलिकडच्या काळात या ठिकाणी एकही दुर्घटना घडली नाही. अशा परिस्थितीत वर्षासहलींवर निर्बंध लादणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वर्षा सहलींवर बंदी आणण्या पेक्षा ही ठिकाणे पर्यटकांच्या दृष्टीने अधिक सरक्षित कळी होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत या निमित्ताने व्यक्त केले जाते आहे.