भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलापासून कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. पण, २८ मेला नव्या संसद भवनासमोर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर ३० मे कुस्तीपटू आपली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
“ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक…”
पत्रात राज ठाकरेंनी म्हटलं की, “सस्नेह जय महाराष्ट्र, आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती. ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत.”
हेही वाचा : “कुस्तीगीरांनी असं कुठलंही पाऊल…” केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा सल्ला
“ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा…”
“रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे,” असं राज ठाकरे
“…हीच सहृदयता महिला कुस्तीपटूंना दाखवावी”
“तसेच ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली, तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
हेही वाचा : कुस्तीपटूंना आता भाजपाच्या नेत्यांचाही पाठिंबा; शेतकरी नेते महापंचायत भरवून खेळाडूंना समर्थन देणार!
“आपण ह्या विषयांत लक्ष घालावं अन्…”
“म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे. आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती,” असेही राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.