काही दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम वाढला आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून शरद पवारांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही शरद पवार-अजित पवार यांच्यातील भेटीवरून टीका केली आहे. शरद पवार भाजपाबरोबर गेले तरच अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातली आहे. त्यामुळे अजित पवार वारंवार शरद पवारांची भेट घेत आहेत, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार जे काही बोलले, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण ते संबंधित बैठकीत नव्हते. त्यामुळे त्यांना या बैठकीबद्दल काहीही माहीत नाही. तरीही ते अशापद्धतीने बोलत असतील, तर त्यावर मला काहीही बोलायचं नाही, अशा शब्दांत रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे…”, शरद पवारांच्या बीडमधील सभेवरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा

विजय वडेट्टीवारांच्या विधानाबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “विजय वडेट्टीवार यांचं ते वैयक्तिक मत असेल. ते त्या बैठकीत नव्हते. बैठक झाली की नाही झाली? तेही आपल्याला माहीत नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्या नेत्याला काहीच माहीत नाही, तरीही ते अशापद्धतीने बोलत असतील, तर मला त्यावर काहीही बोलायचं नाही. माझं एकच मत आहे की, शरद पवार जेव्हा एखादा विषय स्पष्ट करतात, तेव्हा त्यावर चर्चा करुन आपण कुणाचाच वेळ वाया घालवू नये.”

हेही वाचा- “निवडणुका आल्या की प्रत्येक पक्ष सर्वच जागांवर दावा सांगतो”, रोहित पवारांचं वक्तव्य

महाविकास आघाडीतील संभ्रमानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसकडून वेगळा फॉर्म्युला ठरवला जात आहे. त्यासाठी गुप्त बैठका घेतल्या जात आहेत, यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार पुढे म्हणाले, “राज्यात त्यांच्या कितीही गुप्त बैठका झाल्या तरी शरद पवार दर दोन-तीन दिवसाला सोनिया गांधी, राहुल गांधी उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत. खालच्या स्तरावरील नेत्यांमध्ये कितीही बैठका झाल्या तरी निर्णय घेणारे नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत. त्यांना हेही माहीत आहे, शरद पवार जेव्हा लोकांमध्ये जातात, तेव्हा तिथे लोकांचं वादळ निर्माण होतं. वातावरण निर्मिती होते. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी तिन्ही पक्ष एकत्रित असणं महत्त्वाचं आहे. हे तिन्ही पक्षाला माहीत आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar on vijay wadettiwar statement about sharad pawar join bjp then ajit pawar will become chief minister rmm