Sanjay Raut on Girish Mahajan : ठाकरे गट येत्या काही दिवसांत जमिनदोस्त होणार आहे, येत्या आठ दिवसांत त्यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडणार आहे, असं भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं. गिरीश महाजन यांच्या या टीकेवर आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. तसंच, त्यांच्यावर टीका करताना त्यांची जीभही घसरली आहे. त्यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशी अनेक नावं महाराष्ट्रात घेता येतील. हा त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील सर्वांत भ्रष्ट, व्यभिचारी, राष्ट्रदोही लोकांना एकत्र करून आज भाजपा दिसतोय. एकेकाळी भाजपा हा पवित्र, हिंदुत्त्ववादी आणि सुसंस्कृत लोकांचा पक्ष होता. या पक्षाचं नेतृत्व मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी, वसंतराव भागवत, भाऊसाहेब फुंडकर अशा लोकांनी केलंय. पण आज या पक्षाची सुत्रे कोणाकडे आहेत? दलाल, भ्रष्ट, ठेकेदारांकडे सुत्र आहेत. आणि हे लोक आमचा पक्ष जमिनदोस्त करायला निघाले आहेत.”
गिरीश महाजन डरपोक
“तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस, पैसे आहेत. टेंडरबाजीतून, खंडणीतून, त्या ताकदीवर पैसे देऊन पक्ष फोडायचे, त्यातील एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. मला त्यांच्याविषयी काही बोलावं असं वाटत नाही. ज्यादिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्यादिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या. यांच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशा सुरू होत्या, तेच निरोप पाठवत होते की मी राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो. हे डरपोक लोक आहेत”, असं म्हणत संजय राऊतांनी गिरीश महाजांनांबाबत शिवीगाळ केली.
शिवसेनेला संपवणं कोणालाही जमणार नाही
“वेळ प्रत्येकाची येते, आमचीही वेळ येणार. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमिनदोस्त करण्याची तुम्ही भाषा वापरताय. आणि आमचे काही लोक त्यांच्या बाजूला उभं राहून फोटो काढत होते. गिरीश महाजन हे जे बोलत आहेत ही भाषाच त्यांच्या पक्षाला घेऊन बुडणार आहे. आतापर्यंत अनेकजण पक्षातून बाहेर पडले आणि शिवसेना पक्ष फोडण्याची भाषा केली. अमित शाहांनी तर जंगजंग पछाडलं, त्यांना तर महाराष्ट्र फोडायचा आहे. त्याचे गिरीश महाजन हस्तक आहेत. आमचा पक्ष पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे. शिवसेनेला संपवणं हे कोणालाही जमणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.