Sanjay Raut Post : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहिलीच्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या सरकारच्या निर्णयावर चर्चा सुरू होत्या. यादरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीसंबंधीचा आदेश रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून यासंदर्भात प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियाल प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील शाळेत हिंदी सक्ती केली जात असल्याच्या विरोधात ५ जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येते ५ जुलै रोजी मुंबईत सर्व पक्षीय मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मोर्चात राज्यातील सर्व मराठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येते यासंबंधीच्या सरकारी आदेशाची होळी देखील केली होती. मात्र दोन्ही ठाकरे बंधूंचा मोर्चा निघण्याच्या आधीच राज्य सरकारने याबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. आज (रविवार) सायंकाळी पत्रकार परिषद घेत हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ज्यानंतर संजय राऊतांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे हाच ब्रँड!
“हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण.. ठाकरे हाच ब्रँड! (फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय. छान),” अशी पोस्ट शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मोठी पोस्ट लिहिली आहे.
हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2025
हा मराठी एकजुटीचा विजय,
ठाकरे एकत्र येणार याचा धसका,
५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण..
ठाकरे हाच ब्रँड!
(फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान) pic.twitter.com/eTm1Rei41B
राज ठाकरेंची पोस्ट
“इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये… त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा. मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.”