राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेतील काही मंत्री काही दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये जाऊन आले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वबूमीवर भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून एकीकडे भाजपाला लक्ष्य केलं असताना दुसरीकडे त्यांनी शिंदे गटावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संजय राऊत?

“बाळासाहेब ठाकरेंची, शिवसैनिकांची बाबरी पाडण्यात कोणतीही भूमिका नाही असं चंद्रकांत पाटील म्हणतायत. बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीला शिलेदार पाठवले नव्हते असं ते म्हणतायत. आता यावर जे काही त्यांच्या मांडीला मांडी किंवा अजून काय लावून सरकारमध्ये बसले आहेत आणि काल त्यांच्या चड्डीची नाडी पकडून जे अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते त्या मिस्टर डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या ४० लोकांचं काय म्हणणं आहे? आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार वगैरे जे तीर ते मारत असतात, त्यांच्याकडून मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे”, असं संजय राऊत आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

“बाळासाहेब ठाकरेंचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. तु्म्ही गुलाम झाल्यामुळे, शिवसेना फोडल्यामुळे चंद्रकांत पाटील किंवा भाजपाचे लोक सातत्याने शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत आहेत. यावर आज मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. पण हिंमत असेल तर. कारण ते गुलाम आहेत. गुलामाला हिंमत नसते. गुलाम हा गुलाम असतो”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटली?

“त्यावेळी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते”, असं चंद्रकांत पाटील यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

“बाबरी तोडली आणि त्यानंतर भाजपानं पलायन केलं हा इतिहास आहे.’बाबरी तोडणारे आमचे, भाजपाचे किंवा अन्य कुणीही नव्हते. ते शिवसैनिक होते’ हे भाजपाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी जाहीर सांगितलं. त्यानंतर लगेच बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की होय, तुम्ही जर पळून गेला असाल आणि बाबरी तोडणारे शिवसैनिक असतील तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे”, असं संजय राऊतांनी यावेळी भाजपाला सुनावलं.

मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारमधील आमदारांत नाराजीचा सूर? बच्चू कडू स्पष्टीकरण देत म्हणाले…

संजय राऊत यांचं एकनाथ शिंदे गटाला आव्हान

“आम्ही पळपुटे नव्हतो आणि नाही. ज्या पळपुट्यांना घेऊन आज भाजपाने सरकार बनवलं आहे, त्यांची हिंमत एवढी वाढली आहे की ते आता बाळासाहेब ठाकरेंवरही चिखलफेक करू लागले आहेत. त्या चिखलात बसून डॉ. मिंधे आणि ४० आमदार सत्ता उपभोगतायत हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. चंद्रकांत पाटलांच्या मुखातून भाजपा बोललाय. त्यांना माहिती आहे की सत्तेचे मिंधे तोंड उघडणार नाहीत त्यावर. मी तर म्हणेन निषेध म्हणून राजीनामे द्या. आहे का हिंमत तुमच्यात? नसेल तर शिवसेना आणि हिंदुत्वाचं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही जाहीर करा की आम्ही भाजपाच्या सत्तेत सामील झालेले गुलाम आणि मिंधे आहोत”, असं जाहीर आव्हानच संजय राऊतांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams cm eknath shinde chandrakant patil bjp on babri demolish statement pmw