बारामतीमध्ये सरकारतर्फे ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. २ आणि ३ मार्च रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि बारामतीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण मिळालेलं नाही. खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या पुणे कार्यालयात सदर निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आली. मात्र शरद पवार यांना निमंत्रण दिलेलं नाही. सुप्रिया सुळे यांनी निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. त्यामध्ये त्यांचे नावही समाविष्ट करण्यात आलेले नसल्याचे दिसले. शरद पवार आणि बारामती असे समीकरणच आजवर दिसत होते. मात्र पहिल्यांदाच त्यांना एखाद्या शासकीय कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे. या प्रकरणी आता संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात माध्यमांशी बोलत असताना सांगितले की, शरद पवारांना निमंत्रण मिळाले नसले तरी ते बारामतीकर म्हणून प्रेक्षकांमध्ये बसून हा कार्यक्रम पाहण्यासाठी तयार आहेत. तसेच त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना गोविंदबागेतील घरी जेवणाचे निमंत्रणही दिले आहे. तसेच माझ्या संस्थेत येत आहात तर गेस्ट हाऊसवर चहासाठी या, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यांची ही कृती शिष्टाचार नाकारणाऱ्या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

अशा प्रकारचं राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती-संजय राऊत

अशा प्रकाराचं राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. सरकारी कार्यक्रमात सत्ताधारी पक्षाचा आमदार किंवा खासदार नाही म्हणून त्या व्यक्तिला बोलवायचं नाही असं कधीही होत नव्हतं. महारोजगार मेळावा हा काही यांच्या माता-पित्यांचा आहे का? महारोजगार मेळावा सरकारी योजना आहे, ती भाजपाची किंवा शिंदे गँगची योजना नाही. विद्यमान खासदार आणि आमदार हे सरकारी योजनांचा भाग असतात. तरीही सरकार शरद पवारांना बोलवत नाही? अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण हे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलं आहे. त्याआधी असं डर्टी पॉलिटिक्स अलिकडे सुरु झालं आहे.

हे पण वाचा- महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…

देवेंद्र फडणवीस राजकारणाला लागलेली वाळवी

हा कोणता खेळ चालला आहे राज्यात? पैसे तुमच्या घरच्या झाडाला आलेत का? वर्षा बंगल्यावर, सागर बंगल्यावर, देवगिरी बंगल्यावर जी झाडं आहे त्यांना खोके लागलेत का? तिथे जमिनीतून खोके उगवत आहेत का? मर्जीप्रमाणे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार, खासदारांना निमंत्रण देत नाही हा कुठला प्रकार आहे? केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर, महानुभव सत्तेत आल्यापासून ही वाळवी सुसंस्कृत राजकारणाला लागली आहे. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.