सातारा: अतिवृष्टीमुळे जिह्यात एक हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिह्यातील तेरा मंडलात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ज्यांचे तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशांना मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. दरम्यान, दुष्काळी तालुक्यात खटाव येथून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. त्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे जिह्यात एक हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिह्यातील तेरा मंडलात पावसाने सर्वाधिक नुकसान झाले आहे. म्हसवड शहरांमध्ये काही घरांमध्ये, जवळपास २३ दुकानांमध्ये पाण्यामुळे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झालेले होते. आता सर्व रस्ते पूर्ववत खुले झालेले आहेत. दुसऱ्या दिवसापासून कुठेही अतिवृष्टी झाली नाही. तीन मंडलात दि. २८ ला अतिवृष्टी झाली होती. ती महाबळेश्वर तालुक्यात त्या दिवशी झाली नव्हती. पूर्व भागामध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी साठले होते. आता सगळे पाणी कमी झालेले आहे. रस्ते पूर्ववत सुरू झालेले आहेत. पंचनामे करण्याचे काम अतिवृष्टी झालेल्या १३ मंडळांमध्ये सुरू आहे.

नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कृषी सहायक, महसूल सहायक आणि ग्रामपंचायत अधिकारी पाठवले आहे. जेथे तीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दर्शवत असतील तर त्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसेच सततच्या पावसामुळे जे नुकसान होत असते, त्यासाठी वेगळा आदेश शासन दरवर्षी काढत असते. त्याच्याविषयी मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊन तो निर्णय घेतला जातो. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय होऊन आम्हाला निर्देश प्राप्त होतील. त्यानुसार पीक कापणीनुसार उत्पादन क्षमतेनुसार भरपाई दिली जाते. यावर्षी पावसाचा खंड पडलेला नाही. त्यामुळे पिके सुकायला लागली आहेत. अतिवृष्टी प्रत्येक महिन्यात झाली आहे.

ऑगस्टमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्याच्या अगोदर ऑगस्टच्या १७,१८ व १९ दरम्यान आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये पाऊस जास्त झाला होता. त्यावेळेस पूर्वेकडे पाऊस झाला नव्हता आणि पश्चिम घाटामध्ये सुद्धा आपल्या नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता (कॅरिंग कॅपॅसिटी) जेवढी होती त्याच्यापेक्षा खूप जास्त पाणी झाल्याने नदी पात्रात पाणी सोडले होते. काही ठिकाणी रस्ते बंद झालेले होते. नंतर सुदैवाने पाऊस कमी झाल्यामुळे फार मोठ्या आपत्तीला आपल्याला सामोरे जावे लागले नाही, असे त्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन

राज्यावर अतिववृष्टी आणि त्यातून आलेल्या पुरामुळे मोठी आपत्ती कोसळली आहे. याचा अनेकांना फटका बसला आहे. या पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या वेळी केले.