Shambhuraj Desai On Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ देखील घेतली. मात्र, या मंत्रिमंडळातून काही दिग्गज नेत्यांना डावल्यात आलं. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे काही नेते आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्याही काही नेत्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर काही नेत्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे, तर काही नेते नाराज असल्याचं खासगीत सांगत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, महायुतीतील नाराज नेत्यांबाबत आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं. महायुतीतील नाराज झालेल्या नेत्यांचे मला निरोप येत आहेत, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या विधानावर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाला खुलं आव्हान दिलं. महायुतीतील नाराज नेत्यांचा तुम्हाला निरोप येत असणाऱ्या नेत्यांची नावं सांगा, मग आम्ही देखील तुमचे कोणते नेते संपर्कात आहेत त्यांची नावं सांगू, असं शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा : “होय, मी उद्धव ठाकरेंशी बोलतो”, भुजबळांची कबुली; शरद पवार व सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत म्हणाले…

शंभुराज देसाई काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानासंदर्भात शंभुराज देसाई बोलताना म्हणाले की, “मला याबाबत माहिती नाही. मात्र, त्यांनी (उद्धव ठाकरे) त्या नेत्यांची नावं सांगावीत. मग आम्ही देखील शिवसेना ठाकरे गटाचे जे लोक निवडून आले आहेत. त्यांच्यामध्ये मोठी अस्वस्था आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी महायुतीमधील नाराज लोकांची नावं जर सांगितली तर आम्ही देखील महाविकास आघाडीतील जे नेते आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं सांगू”, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

महायुतीच्या मंत्रिमंडळात काही नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे काहीजण नाराज असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “मला कोणीतरी विचारलं की तिकडे (महायुतीतील) नाराज झालेले नेते तुमच्या संपर्कात आहेत का? तर मला त्यांचे निरोप येत आहेत. आता त्यांना कळतंय की तुमची म्हणजे माझी भूमिका बरोबर होती. पण शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. शेवटी अनुभव हाच चांगला गुरु त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांनाही अनुभव येऊ द्या मग पाहू”, असं भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

‘मातोश्री’चे दरवाजे नाराजांसाठी उघडे असतील का?

महायुतीत मंत्रिपद न मिळाल्याने काही नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात नाराज नेत्यांसाठी ‘मातोश्री’चे दरवाजे उघडे असतील का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “मला २०१९ साली अनुभव हा गुरु मिळाला. आता जे नाराज झाले आहेत त्यांनाही अनुभव हा गुरु मिळतोय. त्यामुळे ते त्यामधून काय धडा घेतात? त्यावर सर्व अवलंबून असेल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraj desai on uddhav thackeray and mahayuti cabinet expansion maharashtra mahyuti and mahavikas aghadi politics gkt