sharad pawar advise to govt amide Farmers losses due to heavy rains flooding in maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, यामुळे नदी-नाल्यांना पूर तर आलेच यामुळे अनेक ठिकाणी शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसाटा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला आहे. ज्यानंतर विरोधकांकडून सरकारने शेतकर्‍यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे. सरकारकडून देखील शेतकरी आणि पीडित नागरिकांच्या मदतीसाठी पावले उचलली जात आहेत. यातच आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा अनुभव असलेल्या शरद पवारांनी सरकारला काही सल्ले दिले आहेत.

शरद पवारांनी या नैसर्गिक संकटाच्या काळात राज्य सरकारने काय करावे, कोणती पावले प्रामुख्याने उचलावीत याबद्दल काही सल्ले दिले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी विसृत पोस्ट केली आहे. शरद पवार यांनी लातूर येथील भूकंप, मुंबई बॉम्बस्फोट या काळात ते मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाचा दाखला यावेळी दिला आहे.

“महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाहीतर जनावरेदेखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत. या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. अतिवृष्टीने केवळ शेतकरी वर्ग बाधित झाला नसून त्याची मोठी झळ गावातील लहान मोठे व्यावसायिक, कारागीर आणि शेतमजुरांना देखील बसली आहे. एकंदरीत गावांमधील बारा बलुतेदार, मागासवर्गीय समुदायावर देखील हे अरिष्ट कोसळले आहे,” असे शरद पवार म्हणाले आहेत.

गावातील इंधन, शिक्षण, आरोग्य या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले आहेत. “गाव पातळीवर इंधनाचा आणि अन्नाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान करण्याची आवश्यकता आहे. रोगराई पसरण्याची शक्यता असून त्यास आळा घालून आरोग्याच्या सुविधा देखील तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे. विद्यार्थांच्या शिक्षणावर देखील विपरीत परिणाम झाला असून त्याकडे त्वरेने लक्ष द्यावे लागेल.”

पंचनामे करण्याएवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष्य

आपत्तीग्रस्त भागात वाढलेल्या नेत्यांच्या दौऱ्यांकडे देखील शरद पवरांनी लक्ष वेधले आहे. “दरम्यान, पिडीतांना भेटण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची अतोनात गर्दी होत असल्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष, नुकसानीचे पंचनामे व आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे,” असे शरद पवार म्हणाले आहेत.

यावेळी लातूर भूकंपाच्या वेळी घेतलेल्या निर्णयाची आठवण शरद पवारांनी करून दिली आहे. “लातूर भूकंपावेळी पंचनामे व मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्याचा प्रमुख ह्या नात्याने मी लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवले, एवढेच नव्हे तर इतर नेते व दस्तुरखुद्द मा. प्रधानमंत्र्यांना देखील काही दिवस भूकंपग्रस्त भागात दौरा करू नयेत अशी विनंती केली होती,” असे पवार म्हणाले.

मी राज्याचा प्रमुख असताना….

“शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा व्याप पाहता पंचनामे वेळेत करून योग्य मदतकार्य सुरु व्हावे यासाठी आपत्तीग्रस्त भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त मनुष्यबळ व महसूल, कृषी, पाटबंधारे व इतर शासकीय अधिकारी यंत्रणा तातडीने पाचारण करणे आवश्यक आहे. मी राज्याचा प्रमुख असताना मुंबई बॉम्बस्फोट, लातूरचा भुकंप यासारखी अस्मानी-सुलतानी संकटाची परिस्थिती जवळून पाहिली आणि हाताळली आहे. अशा भयानक संकटात सापडलेली हजारो घरे व कुटूंबे पुन्हा उभी करण्यासाठी शासकीय यंत्रणेचे योगदान मोलाच होतं आणि अशा प्रसंगी शासकीय कर्मचारी स्वत:ला झोकून देऊन काम करतात हे महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणेनं अनेकदा सिद्ध केलेलं आहे. फक्त तिच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. या प्रसंगी राज्यसरकार पीडितांना दिलासा देण्याचे, त्यांना पुन्हा सक्षम करण्याचे काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो,” असेही शरद पवार म्हणाले आहेत.