खासदार संजय राऊत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची तोफ म्हणून ओळखलं जातं. नाशिकमध्ये आज त्यांनी जोरदार भाषण केलं आणि नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री आपलाच होणार अशी घोषणाही करुन टाकली. संजय राऊत यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात आणि देशात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर चार विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. नाशिक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंच्या प्रचारासाठी शिवसेनेचा मेळावा पार पडला. त्यावेळी संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संजय राऊत?

“मुंबईतला आमचा अनुभव वाईट आहे. आम्ही राजकारणातले लोक आहोत, आम्ही हेराफेरी करतो, मतदार आणतो, बसवतो. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था आहे. बोगस शिक्षक, बोगस शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नोंद झाली आहे. अशा लोकांना शोधून त्यांच्यावर खटले दाखल झाले पाहिजेत.” असं संजय राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावरही त्यांनी टीका केली.

राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष, संजय राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका; म्हणाले…

एकनाथ शिंदे आणि शिक्षणाचा काय संबंध?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत, पण त्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का? दोन, अडीच वर्षांत शिक्षणासंबंधी ते कधी काही बोलले का? त्यांचा उमेदवार म्हणतो आण्ही शिक्षकांना गुलाम बनवू. शेतकरी आणि शिक्षक महाराष्ट्रात या सरकारच्या कार्यकाळात समाधानी नाही. शिक्षकी पेशाला देशात मान-सन्मान होता आता मात्र तो दिसत नाही. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोपी नाही. ५४ तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपेक्षा तुमची यात्रा मोठी आहे. असंही संजय राऊत म्हणाले.

शिक्षण क्षेत्रात काही बदल घडलेले नाहीत

शिक्षण क्षेत्र आणि शाळेशी संबंध नसलेले राज्यकर्ते लाभले म्हणून आपल्याला शिक्षण क्षेत्रातही बदल होताना दिसत नाही. मी आणि उद्धव ठाकरे बैठका घेतो, फोन करतो त्यामुळे सध्याच्या मुख्यमंत्र्यांचं धाबं दणाणलं आहे. त्यामुळे ते नाशिकमध्ये फिरत आहेत. मात्र लोकांचा आता मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीने हे दाखवून दिलंय असंही संजय राऊत म्हणाले.

नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री

नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री होणार आहे अशी घोषणा संजय राऊत यांनी आपल्या भाषणात केली. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाची चर्चा, जागावाटप कसं होणार याची चर्चा हे काहीही घडलेलं नसताना संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. संजय राऊत यांच्या या वक्तव्याची चर्चा होत असताना आता या वक्तव्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमधूनही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena ubt mp sanjay raut statement said our cm will be there after november scj