गेल्या तीन दिवसांपासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. या सुनावणीमध्ये पहिले तीन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे सुनावणीमुळे राजकारण तापलं असताना दुसरीकडे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तान महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सत्ताधारी शिंदे-भाजपा युती आणि प्रमुख विरोधी महाविकासआघाडी या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही बाजूंकडून दिग्गज नेतेमंडळी प्रचारात उतरली आहेत. भाजपाकडून गुरुवारी कसब्यात सध्या आजारी असलेले गिरीश बापट यांनाही प्रचारात उतरवण्यात आलं होतं. या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षांनी भाजपाला घेरायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेही काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचारात सहभागी झाले होते. त्यांनी या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या व्हीपवर युक्तिवाद; नेमकी ठाकरे गटाची भूमिका काय? ३ जुलैला काय घडलं होतं?

“भाजपाचं क्रौर्य किती भयंकर आहे ते…”

“भाजपाने आत्तापर्यंत वापरा आणि फेकून द्या असंच धोरण अवलंबलं आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपाने टिळक कुटुंबीयांना वापरून फेकून दिलं. लोकमान्य टिळकांच्या वंशजांवर हा अन्याय करून भाजपा थांबली नाही. कसब्यातून भलत्याच उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर आजारी गिरीश बापटांना प्रचारात उतरवलं. त्यांची अवस्था पाहून तर मला भाजपाचं क्रौर्य किती भयंकर आहे ते जाणवलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवसेना मूळापासून संपवायला निघालेल्या भाजपाला मदत होईल असं..” उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मध्यावधी निवडणुकांचे संकेत!

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीचा त्यांनी यावेळी संदर्भ दिला. “तुम्ही तुमचा चोरलेला धनुष्यबाण घेऊन या. आम्ही मशाल घेऊन येतो” असं आव्हान त्यांनी यावेळी शिंदे गटाला दिलं. तसेच, “आज मात्र कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल, लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. ते जर उडाले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray on supreme court hearing kasba by election targets bjp pmw