Uddhav Thackeray: शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. शिवसेनेच्या दोन्ही गटांचा वर्धापनदिन साजरा होत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर टीका केली. आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष संभाव्य युती-आघाडीची चाचपणी करत आहेत. तसेच इतर पक्षातील नेत्यांना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. या राजकारणावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. राजकारणात ज्यांना मुलं होत नाहीत, ते दुसऱ्यांची मुलं चोरतात. भाजपा पक्ष असाच आहे, असे ते म्हणाले. तसेच राज ठाकरे आणि आपली युती होऊ नये, यासाठी काही लोक प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

भाजपाचं सरकार आल्यापासून पनवती लागली

केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आल्यापासून पनवती लागली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. “कुठे विमानातळचं छत गळतंय, मेट्रो स्थानकात पाणी शिरतंय, प्रयागराजला माणसं चेंगरून मेली, दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी होऊ माणसं दगावली तरी याची जबाबदारी कुणीही घेतली नाही. कालपरवा विमान अपघात झाला, रेल्वेचा अपघात झाला. माणसं गेली, त्याचीही जबाबदारी कुणी घेतली नाही”, अशी टीका ठाकरे यांनी केली.

देशाला पंतप्रधान, गृहमंत्रीच नाही

आज देशाला पंतप्रधान आणि गृहमंत्री नाही, असेही ते म्हणाले. “देशाला पंतप्रधान नाही, पंतप्रधान भाजपाचे आहेत. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शाहांची नाही. संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गुंडांना संरक्षण देणाऱ्या राजनाथ सिंहांची गरज नाही”, असा आरोप ठाकरे यांनी केला.

राजकारणात ज्यांना मुलं झाली नाही त्यांनीच दुसऱ्याची मुलं चोरली

उद्धव ठाकरे म्हणाले, “राजकारणात ज्यांना मुलं होत नाहीत, अशी लोक आमच्या घराण्यावर टीका करत आहेत. अशा लोकांची कीव येते. भारतीय जनता पक्ष असाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख असते तर आज त्यांच्यासाठी वेगळा शब्द वापरला असता. त्यांना आजवर कधी मुलं झाली नाहीत, त्यामुळं ते दुसऱ्यांची मुलं स्वीकारत आले”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी आणली होती. त्याच वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा बांधण्याची वेळ यांच्यावर आली. हे लोक आता आपल्याला शिकवत आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.