Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीची राज्यात रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच नेत्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका सुरु आहे. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“आपल्याला धोकेबाजीचं राजकारण जाळून भस्म करावं लागेल. महाराष्ट्राचा स्वाभिमान पैशाने विकत घेता येत नाही. कोकणाचं भविष्य तुमच्या हातात आहे. राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते तुमच्यासारखे खोके घेऊन सुरतेला पळालेले नाहीत. त्यांच्या घरी धाडी पडल्या. मात्र, ते मागे हटले नाहीत. त्यांना आता मी सांगितलं की लढा कोण आढवं येतं पाहू आणि ते लढत आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.

हेही वाचा : “आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची बोचरी टीका

“तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत करता? मग तकडे सिंधुदुर्गमध्ये पंतप्रधान मोदींच्या अशुभ हाताने जो पुतळा उभा केला होता. तो पुतळा कोसळला. त्यात किती पैसे खाल्ले हे पाहिले तर मग तुमची लायकी कळेल. मात्र, आपल्याला फसवलं. पंतप्रधान मोदी आले आणि त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने पुतळ्याचं अनावरण केलं आणि आठ महिन्यांत महाराजांचा पुतळा कोसळला. आठ महिन्यांत महाराजांचा पुतळा कसा कोसळतो? हे महाराष्ट्र सहन करणार नाही. हे मोदींच्या लक्षात आलं आणि मग ते महाराष्ट्रात आले आणि त्यांनी माफी मागितली. पण ती माफी देखील धमकी द्यावी तशी गुर्मीत माफी मागितली. महाराष्ट्र तुम्हाला काय वाटतो? तुमचं पायपुसणं आहे का? महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केला.

“महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. फक्त महाराष्ट्रातच नाही तर सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आज काहीजण माझ्यावर बोलताना घरी बसून राहिल्याची टीका करतात. मी घरी बसून सर्वांची घरे तरी सांभाळली, म्हणून राज्यातील जनता मला कुटुंबप्रमुख मानते. मात्र, तुम्ही घर फोडे आहात. शरद पवारांचं घर फोडलं. घरं फोडता आणि राज्य करता”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. “मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुमचा काय गुन्हा केला होता?”, असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray pm narendra modi bjp politics eknath shinde devendra fadnavis maharashtra assembly elections 2024 gkt