वाई: लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र येण्याची शक्यता फारच कमी असल्याचे व घड्याळ या चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगच करेल असे मत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील आज शनिवारी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी केली आहे. अजित पवार शरद पवार यांच्या गटासमोर आपले उमेदवार उभे करण्याची भाषा करत आहेत, यावर घड्याळ चिन्हाचाही विषय चर्चिला जात आहे. लोकसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतात काय, असे विचारले असता याची शक्यता फारच कमी असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा – जालना-मुंबई वंदे भारतच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थी स्थानकावर; भाजपा आणि शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन, वंदे भारतचे महाराष्ट्र कन्येकडून सारथ्य

घड्याळ चिन्ह कोणाला जाणार असा प्रश्न वळसे पाटील यांना विचारला असता त्याचे उत्तर निवडणूक आयोगच देईल, असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केले. अजितदादांना अध्यक्ष करण्यासाठी खासदार शरद पवारांनी बैठक बोलावली होती. मात्र त्यावेळी अजित पवार अध्यक्षपद नको म्हणाले होते, असे जयंत पाटील बोलल्याचे निदर्शनास आणले असता वळसे-पाटील म्हणाले, माझ्यासमोर अशी चर्चा झाली नव्हती. मला त्याबाबत काहीही माहीत नाही, असं सांगत याविषयी अधिक बोलणे टाळले.

प्रभू रामचंद्र हे सर्वांच्या अस्थेचा विषय आहे, त्यामुळे आपण देवाला देवाच्या जागी ठेऊया असा सूचक सल्ला त्यांनी संजय राऊत यांना दिला. भाजपाने आता फक्त रामलल्लालाच निवडणुकीत उभे करायचं राहिले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी अधिकचे बोलणे टाळले. मात्र संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते नेहमी अशी वेगवेगळी वक्तव्ये करत असतात आणि सल्ले देत असतात. प्रभू रामचंद्र हे सर्वांच्याच आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आपण देवाला देवाच्या जागी ठेऊया, असे म्हणत याबाबत अधिक काय बोलणार असा प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा – “आमच्या पाडा पाडीत पडाल, तर…”, कोल्हेंना दिलेल्या ‘त्या’ आव्हानावरून राऊतांचा अजित पवारांना इशारा

जीगाव प्रकल्पात थेंबभर पाणी नाही, हे धरण अजून पूर्ण झालं नाही. मग तीन हजार तीनशे कोटींचं टेंडर निव्वळ ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी आणि ठेकेदारांना निवडणुकीपूर्वी तीन हजार तीनशे कोटींचा ठेका देण्याचा प्रयत्न दिसतोय, असा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी सरकारवर केला असल्याबाबत दिलीप वळसे-पाटील यांना विचारले असता त्यांनी याबाबत अजित पवार जास्त बोलू शकतील, असे सांगून याविषयी बोलणे टाळले.

अजित पवारांच्या नजीकचे संजय वाघेरा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पिंपरी चिंचवड आणि मावळ येथील राजकारणात अजित पवार गटाला धक्का वगैरे असा काही बसलेला नाही. अजित पवार यांनी त्यांना पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून संधी दिली होती. ते पक्षाचे तेथील अध्यक्ष होते. त्या ठिकाणी आता नव्याने नेतृत्व तयार झालेले आहे. यापूर्वी वाघेरांना संधी दिलेली होती. कदाचित आपल्याला पुढे संधी मिळेल याची शाश्वती नसल्याने त्यांनी पक्षबदल केला असेल, असे वळसे पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sharad pawar and ajit pawar come together in the lok sabha elections what did minister dilip valse patil say in satara ssb