अमली पदार्थविरोधी पथकाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर रेव्ह पार्टीमध्ये तीन ऑक्टोबरच्या पहाटे अटक केली. तेव्हापासून शाहरुख खानचं कुटुंब चर्चेत आहे. २ ऑक्टोबरच्या रात्रीपासून आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये एनसीबीने ताब्यात घेतलेल्या आर्यन खानवर टीका केली जात आहे. तीन वेळा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. असं असतानाच दुसरीकडे या प्रकरणावरुन टीका होऊ लागल्याने शिक्षण क्षेत्रामधील आघाडीची ऑनलाइन शिक्षण सेवा पुरवणाऱ्या बायजू कंपनीने शाहरुख खान असणाऱ्या जाहिराती काही काळापुरत्या या जाहिराती थांबवण्यात आल्या आहेत. शाहरुख या पुढे या कंपनीशी संलग्न राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र शाहरुख सारख्या बड्या स्टारला कंपनीने दूर लोटल्याने हिंदी चित्रपट सृष्टीमधील अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वीच आलेल्या वृत्तानुसार शाहरुखने यापूर्वीच त्याच्या पठाण चित्रपटाचं शुटींग पुढे ढकललं आहे. तसेच अटली या दक्षिणात्य दिग्दर्शकासोबतच्या नयनतारा या चित्रपटाचं शुटींग अनिश्चित कालासाठी स्थगित केलं आहे. शाहरुख हा सध्या कणखर असल्याचं आपल्या निर्णयांमधून दाखवत असला तरी तो फार तणावाखाली असल्याचं काही मनोरंजन सृष्टीमधील साईट्सने म्हटलं आहे.

आर्यनला अटक झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला मन्नतमध्ये जाऊन भेट घेतलीय. यामध्ये सलमान खान, करण जोहर यासारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन याला या प्रकरणानंतर अभिनेता ऋतिक रोशन, हंसल मेहता, पुजा भट्ट, रविना टंडन यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल नेटवर्किंगवरुन पाठिंबा दर्शवलाय. त्यातच आता अनेक सेलिब्रिटींनी बायजू प्रकरणावरुन शाहरुखची बाजू घेतलीय.

एकीकडे असं असतानाच बायजूने शाहरुख असणाऱ्या जाहिराती थांबवल्या आहेत. याच निर्णयानंतर अभिनेता अली फैजलने शाहरुखची पाठराख केली आहे. पिंक फ्लेऑडच्या गाण्याचा संदर्भ देत त्याने बायजू, मी आज सकाळपासून अनदर ब्रिक इन द वॉल हे गाणं हेडफोन्स लावून मोठ्याने ऐकतोय,” असं म्हटलं आहे. या गाण्यामधील एका ओळीत शिक्षण नाही असं प्रकार आम्हाला नकोय, असा अर्थ आहे. अलीची प्रेयसी आणि अभिनेत्री रिचा चढ्ढानेही हे ट्विट रिट्विट केलंय.

अभिनेत्री अंजना सुखानीनेही शाहरुखला समर्थन करणारं ट्विट केलंय. “प्रिय कंपन्यांनो, शाहरुख खानची लोकप्रियता, माहिती पोहचवण्याची क्षमता आणि चार्म हा दुसऱ्या कोणाला येणार नाही. सध्या तो ज्या संकटामध्ये अडकलाय त्यापेक्षा किंग खान म्हणून त्याची जी किंमत आहे ती फार मोठी आहे. त्याचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात याची ताकद तुम्ही विसरु नका. जगभरामध्ये त्याचे हितचिंकत आणि चाहते आहेत,” असं अंजनाने म्हटलं आहे.

तर छोट्या पडद्यावरील अभिनेता नकूल मेहताने बायजूने शाहरुखच्या जाहिराती बंद केल्याच्या ट्विटवर प्रितिक्रिया देताना म्हणतो, “शाहरुखची जागा आता सध्या मंत्री असणारा आणि ज्याच्या मुलाला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीय तो नेता घेणार आहे. मस्त बायजू,” असं म्हटलं आहे. आर्यन खानला अटक झाल्यापासून शाहरुखवर टीका केली जातेय. शाहरुखने मुलाला नीट शिकवण दिली नाही अशा पद्धतीचा तक्रारीचा सूर अनेकांनी ट्विटरवरुन लावल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर नकूल मेहताने शाहरुखची शिकवण चुकीची असेल तर केंद्रात मंत्री असणाऱ्याच्या मुलावर हत्येचा गुन्हा आहे त्याला जाहिरातीत घ्या असा उपरोधिक सल्ला दिलाय.

२०१७ सालापासून शाहरुख खान बायजू या लर्निंग ॲपचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे. यासाठी शाहरुख खानला प्रतिवर्षी तीन ते चार कोटी रुपयाचं मानधन मिळत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बायजूने शाहरुख खान सोबतचे सर्व प्रमोशन्स सध्या बंद केले आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावरून भाजपामध्ये धुसफूस
लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणानंतरही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे मंत्रीपदावर कायम असल्याच्या मुद्द्यावरून भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस वाढू लागली आहे. मिश्रा यांच्यावर टीका केल्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, प्रभारी राधामोहन सिंह आणि संघटना सचिव सुनील बन्सल हे तिघेही सोमवारी दिल्लीत येऊन दाखल झाले. राज्यमंत्री मिश्रा यांच्या राजीनाम्यासंदर्भात विरोधकांची मागणी तीव्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे नेते केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते.

भाजपा नेत्याने थेट साधला निशाणा
भरधाव कारने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेनेनंतर ( ३ ऑक्टोबर) आठ दिवसांनी या प्रकरणातील संशयित आशिष मिश्रा यांना सोमवारी अटक करण्यात आली. मात्र, या हत्याकांडासंदर्भात वरुण गांधी वगळता भाजपाच्या बडय़ा नेत्यांकडून कोणतीही टिप्पणी केली गेली नव्हती. हे मौन स्वतंत्रदेव सिंह यांनी तोडले असून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या वर्तणुकीवर उघड टीका केली आहे. नेत्याने निवडणूक चांगल्या वर्तणुकीतून जिंकायची असते, राजकारण म्हणजे समाजाची आणि देशाची सेवा असते. राजकीय नेते लोकांना लुबाडण्यासाठी नसतात. फॉच्र्युनर गाडीखाली लोकांना चिरडण्यासाठी नेते व्हायचे नसते. गरिबांची सेवा करण्यासाठी आपण भाजपामध्ये आहोत. राजकारण हे जाता जाता करायचे काम नव्हे, असा सल्ला स्वतंत्रदेव सिंह यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला असला तरी त्या माध्यमातून राज्यमंत्री अजय मिश्रा यांना लक्ष्य केले आहे.

स्वपक्षीयांवर टीका…
लखीमपूर खेरीतील भाजपचे बुथप्रमुख राम गोपाल पांडे यांनीही पदाचा राजीनामा दिला असून राज्यातील भाजप नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या एकाही नेत्याने मृत कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याबद्दल त्यांनी स्वपक्षीयांवर टीका केली आहे. या आधी फक्त खासदार वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांच्या न्यायाची मागणी केली होती. त्यानंतर वरुण व मनेका गांधी या दोघांनाही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले. लखीमपूर हत्याकांडानंतर अजय मिश्रा यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ali fazal nakuul mehta say brand srk is bigger after byju halts ads featuring shah rukh khan scsg