अक्षय कुमार हा आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. पण, करिअरच्या सुरुवातीला मात्र अभिनेत्याच्या अनेक चित्रपटांना अपयश आलेलं. १९९७-१९९९ हा काळ असा होता, जेव्हा अक्षय कुमारने सर्वाधिक फ्लॉप चित्रपट दिलेले. पण, कलाकार म्हटलं की चढ-उतार येतच असतात. असंच काहीसं अक्षयबरोबरही झालं.
अक्षय कुमारने ‘जानवर’ चित्रपटात बादशाह म्हणजेच बाबू लोहार ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. महत्त्वाचं म्हणजे यातील अक्षय कुमारच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. पण, तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटासाठी अक्षय कुमार पहिली पसंती नव्हता, तर एक वेगळाच अभिनेता चित्रपटाचा नायक असणार होता. चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलेलं. सुनील दर्शन म्हणाले, “या चित्रपटासाठी पहिली पसंती ही अभिनेता सनी देओलला होती. आम्ही चित्रपटाचं काम सुरू करणार होतो, पण तितक्यात आमचं त्याच्याबरोबर काही गोष्टींवरून वाद झाले. ते वाद आजही मिटलेले नाहीत, त्यामुळे मी ठरवलं की या चित्रपटासाठी दुसरा अभिनेता शोधू.”
मुख्य नायकाच्या शोधात असताना सुनील दर्शन यांनी अभिनेता अजय देवगणला यासाठी विचारलं. ते म्हणाले, “अजय व मी एका शनिवारी भेटून याबद्दल चर्चा केली आणि हा चित्रपट करायचं ठरलं. सोमवारी सगळं ठरवून कामाला सुरुवात करणारच होतो तेवढ्यात रविवारी सगळंच बदलून गेलं”. सनी देओलसह वाद झाल्यानंतर सुनील यांनी अजय देवगण व काजोलबरोबर हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्याचदरम्यान या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुनील दर्शन यांना त्यादरम्यान अक्षय कुमाराचा फोन आला होता, ज्याला ते कधीच भेटले नव्हते. सुनील म्हणाले, “त्याने मला फोन करून म्हटलं, त्याला शक्य तितक्या लवकर मला भेटायचं आहे, म्हणून मी त्याला बोलावलं तेव्हा त्याने मला ‘जानवर’मध्ये काम करण्याची त्याची इच्छा असल्याचं सांगितलं आणि तुम्हाला माझ्याबरोबर हा चित्रपट करायला आवडेल का असं विचारलं.”
सुनील दर्शन पुढे म्हणाले, “अक्षयचा तेव्हा वाईट काळ सुरू होता. पण, मला वाटलं तो एक चांगला आणि शिस्तप्रिय अभिनेता आहे, जो त्याचं १०० टक्के द्यायला तयार होता. त्याची तीच गोष्ट मला जास्त भावली. त्याच्या नावाचा वापर करून मी फार पैसे कमावू शकणार नाही हे मला माहीत होतं. पण, मग मी माझ्या कामावर विश्वास ठेवला.” पुढे ते म्हणाले, “अक्षय पूर्वी सनी देओलसह झालेल्या वादानंतर मी अजय देवगण व काजोलची या चित्रपटासाठी निवड केली होती, परंतु तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने ते शक्य झालं नाही. त्यावेळी मला तनुजा (ज्येष्ठ अभिनेत्री व काजोलच्या आई) यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, काजोलच्या लग्नामुळे तिला हा चित्रपट करता येणार नाही, त्यांच्या या खरेपणाचं मला तेव्हा कौतुक वाटलेलं.”