सलमान खान व ऐश्वर्या राय यांचं एकेकाळी अफेअर होतं हे सर्वश्रूत आहे. ऐश्वर्याच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत, तरीही तिच्या २५-२६ वर्षांपूर्वीच्या अफेअरची आजही चर्चा होते. सलमान खान व ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, ऐश्वर्या तर जाहीरपणे सलमानवरचं प्रेमही व्यक्त करत होती, मग नेमकं काय घडलं की या दोघांचं ब्रेकअप झालं? असा प्रश्न चाहत्यांना आजही पडतो.
१९९९ मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या सलमान- ऐश्वर्याच्या नात्याचा शेवट फार वाईट झाला होता. एकेकाळी एकमेकांचा जीव की प्राण असलेले हे दोघे आता एकमेकांचं तोंड बघणंही पसंत करत नाहीत. सलमान व ऐश्वर्या यांच्यात नेमकं काय बिनसलं होतं, त्यांनी लग्न का केलं नाही? यासंदर्भात एका पत्रकाराने मुलाखतीत सांगितलं होतं.
सलमानला लग्न करायचं होतं पण…
मेरी सहेलीच्या पॉडकास्टमध्ये पत्रकार हनिफ झवेरी यांनी सलमान व ऐश्वर्याच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. “सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांवर प्रेम करत होते आणि एकमेकांबद्दल गंभीर होते. दोघांनाही त्यांचं नाते पुढे न्यायचं होतं, पण सलमानचं नाव सोमी अली आणि संगीता बिजलानी सारख्या इतर अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं, त्या सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड होत्या. यामुळे ऐश्वर्याचे आई-वडील सलमानवर नाराज होते आणि त्यांना शंका होती की तो ऐश्वर्याशी फ्लर्ट करत असावा,” असा दावा हनिफ यांनी केला होता.
सलमान-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा का आला?
हनिफ पुढे म्हणाले, “सलमानला लवकरात लवकर ऐश्वर्याशी लग्न करायचं होतं. आणि ऐश्वर्या त्यावेळी करिअरमध्ये अशा टप्प्यावर होती की तिला लग्न करून सेटल व्हायचं नव्हतं म्हणूनच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला… एकदा सलमानने रात्री ऐश्वर्याच्या घराचा दरवाजा खूप जोरात ठोठावला आणि गोंधळ घातला, यामुळे त्यांच्या शेजाऱ्यांनीही तक्रार केली… ऐश्वर्याला ती गोष्टी अजिबात आवडली नाही आणि तिने या नात्यातून बाहेर पडायचं ठरवलं.”
१९९९ मध्ये संजय लीला भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर भेटल्यानंतर ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यातील जवळीक वाढली होती. पण त्यानंतर २००२ मध्ये ते वेगळे झाले. त्यांनी शेवटचं २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम तुम्हारे हैं सनम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. सलमान ऐश्वर्याचं ब्रेकअप झालं तेव्हा ऐश्वर्याचं नाव विवेक ओबेरॉयशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केलं. तर, सलमान खान अद्याप अविवाहित आहे. सलमान व ऐश्वर्या एकमेकांबद्दल बोलणं टाळतात. सलमान खानचं बच्चन कुटुंबाशी चांगलं नातं आहे.