शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा होती. अखेर ७ सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७२ कोटींची छप्परफाड कमाई केली. याबरोबरच गेल्या महिन्यात आलेल्या ‘गदर २’ने ही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत इतिहास रचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गदर २’ आणि मागोमाग आलेल्या ‘जवान’ची लोकांनी खूप प्रशंसा केली. समीक्षकांनीही या दोन्ही चित्रपटांना उचलून धरलं. बॉक्स ऑफिसवर सध्या या दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. याबरोबरच चित्रपटसृष्टीतील बऱ्याच लोकांनीही या दोन्ही चित्रपटांचं कौतुक केलं आहे. आता ‘कांटे’, ‘शूटआऊट अॅट वडाळा’सारखे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी मात्र एक वेगळीच चिंता व्यक्त केली आहे. ‘जवान’ नंतर चित्रपटगृहाची अवस्था पुन्हा आधीसारखीच होईल असं त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : ‘जवान’च्या यशानंतर शाहरुख खानने वाढवले त्याचे मानधन; जवळच्या व्यक्तीने दिलं स्पष्टीकरण

‘इ-टाईम्स’शी संवाद साधताना संजय गुप्ता म्हणाले, “गदर २ व जवान हे बिग बजेट चित्रपट होते, अन् यासाठी निर्मात्यांनी २ ते ३ वर्षं खर्च केलं आहे. पुढील काही आठवड्यात चित्रपटगृहं पुन्हा ओस पडलेली आपल्याला पाहायला मिळतील. आता प्रेक्षकांनाही पुढच्या बिग बजेट चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. सध्या हिंदी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत, पण वितरक आणि चित्रपटगृहांच्या मालकांनाही ठाऊक आहे की हे सगळं काहीच दिवसांपुरतं आहे.”

याबरोबरच शाहरुख, सलमान, अक्षयकुमार यासारख्या बड्या स्टार्सनी वर्षातून एकतरी चित्रपट काढायलाच हवा असं मतही संजय गुप्ता यांनी व्यक्त केलं. ‘गदर २’ व ‘जवान’नंतर आता शाहरुख खानच्या पुढच्या ‘डंकी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. याबरोबरच सलमान खानचा ‘टायगर ३’ आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘अॅनिमल’ या दोन्ही चित्रपटांचीही चांगलीच हवा पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kante director sanjay gupta says after jawan and gadar 2 theatres will be empty again avn