Why did Madhuri Dixit return to India : बॉलीवूडच्या ‘धकधक गर्ल’ने करिअरच्या शिखरावर असताना १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर माधुरी आपल्या पतीबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली होती. लग्नानंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर अभिनेत्रीने सिनेविश्वापासून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांना दोन मुलं झाली आणि हे जोडपं अमेरिकेत आपलं सुखी आयुष्य जगत होतं. यादरम्यान माधुरीचे चाहते तिला ऑनस्क्रीनवर प्रचंड मिस करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधुरीने तेव्हा करिअरपेक्षा जास्त कुटुंबाला प्राधान्य दिलं. याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणते, “मला असं वाटतं, मला आयुष्यात योग्य व्यक्ती भेटली. डॉ. श्रीराम नेने हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्याशी मला लग्न करायचं होतं. कारण, काम करत असताना आपली स्वत:ची सुद्धा अनेक स्वप्नं असतात. माझ्यासाठी माझं घर, नवरा, माझी मुलं, सगळे कुटुंबीय एकत्र माझ्याबरोबर असणं हे माझं स्वप्न होतं. जे मी पुरेपूर जगले.”

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर ‘तो’ क्षण आलाच! अर्जुन सायलीला करणार प्रपोज, अंगठी सुद्धा आणली…; जबरदस्त प्रोमो आला समोर

माधुरी काही वर्षे अमेरिकेत राहिल्यावर २०११ मध्ये भारतात परतली. हा निर्णय का घेतला? याबद्दल माधुरीने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. “मुंबईत परतणं हा निर्णय आमच्या कुटुंबीयांसाठी खूपच सोयीचा आणि जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. माझे आई-वडील माझ्याबरोबरच राहत होते आणि त्यांचंही वय झालं होतं. त्यांना आपल्या देशात परत यायचं होतं. त्यामुळे आम्ही सुद्धा परतण्याचा विचार केला.” असं माधुरी दीक्षितने सांगितलं.

माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ) म्हणाली, “आई-बाबांनी सांगितल्यावर मग आम्हालाही असं वाटलं… अरे जायला काय हरकत आहे? आमची मुलं सुद्धा येथील संस्कृती, भारतातील विविध गोष्टी अनुभवू शकतात. कारण, परदेशात आपण एका कोशात वावरत असतो पण, इथे असं नाहीये. आपल्या देशात अनेक गोष्टी समजून घेता येतात… बेताच्या परिस्थितीतून मार्ग काढून लोक यशस्वी कसे होतात. हे सगळं माझ्या मुलांना समजणं गरजेचं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, माझ्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती. याशिवाय माझं सगळं काम भारतातच होतं. त्यात माझ्या नवऱ्यालाही इथे काही नवीन गोष्टी सुरू करायच्या होत्या. त्यामुळे विचार करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : Video : प्रिया बापटने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायलं गाणं; पती उमेशनेही केलं कौतुक; म्हणाली, “आठवणीत ठेवावी…”

दरम्यान, मायदेशी परतल्यावर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दिवानी’ मधील ‘घागरा’ या डान्स नंबरमधून माधुरी दीक्षितने ( Madhuri Dixit ) बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit reveals why she left america and returned to india in 2011 softnews sva 00