अभिनेते परेश रावल काही दिवसांपासून अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी ‘हेरा फेरी ३’ चित्रपटातून ‘एक्झिट’ घेतल्यानंतर सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि नंतर अनेक दिवस त्यांच्याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. परेश यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मुलाखती दिल्या. यावेळी त्यांनी ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाबद्दल आणि अक्षय कुमारबरोबरच्या मैत्रीबद्दलची मतं मांडली.

‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना अक्षय कुमारबरोबरच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आलं होतं त्यावर ते म्हणाले, “चित्रपटसृष्टीत मित्र नाही; सहकारी असतात. नाटकात मित्र असतात आणि शाळेत जवळचे मित्र असतात.” यावर जेव्हा त्यांना अक्षय कुमार तुमचे सहकारी आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, “हो. मी फक्त ओम पुरी, जॉनी लिव्हर यांनाच मित्र मानतो.” त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अक्षय कुमार व परेश रावल यांच्यामध्ये संबंध बिघडले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु, अक्षय कुमारला ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान, “परेश रावल यांनी चित्रपटातून ‘एक्झिट’ घेतल्यानंतर लोक त्यांना मूर्ख म्हणत आहेत यावर तुमचं काय मत आहे”. असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अभिनेता उत्तर देत अक्षय कुमार म्हणाला, ” तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलू शकत नाहीत. ते माझे चांगले मित्र आहेत. आणि त्या विषयावर बोलण्यासाठी ही योग्य जागा नाही.”

परेश रावल यांच्या अक्षय कुमार व इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दलच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा झाली. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री संजना संघीने याबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजनाला “परेश रावल असं म्हणाले होते की, इंडस्ट्रीत सहकारी असतात; मित्र नसतात यावर तुझं काय मत आहे?”, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

संजना म्हणाला, “मी या वक्तव्याशी सहमत नाहीये. तसं पाहिलं, तर आपण काम करतो, त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर मैत्री झालीच पाहिजे, असं काही नाही. ते शाळा, महाविद्यालय, ऑफिसमध्येही होत नाही. पण, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत असताना अनेकांशी चांगले संबंध होतात. चांगली मैत्री होते. छान माणसं आपल्याला भेटतात. कारण- चित्रपटसृष्टी असं क्षेत्र आहे, जिथे तुम्ही अनेकदा अनेक अनोळखी माणसांसह बराच वेळ घालवता. बऱ्याचदा अनोळखी माणसांसह उठावं-बसावं लागतं. अनेकदा चित्रीकरणादरम्यान एकत्र राहावं लागतं. त्यामुळे मला तरी या इंडस्ट्रीमुळे अनेक चांगली माणसं भेटली आहेत, जे आज माझे खूप जवळचे मित्र-मैत्रिणी आहेत.”