बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच ‘लग जा गले’ या करण जोहरची निर्मिती असलेल्या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत असणार आहे. जान्हवी व टायगर दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

टायगर श्रॉफने काही दिवसांपूर्वी ‘जीक्यू’ला मुलाखत दिली होती, त्यात त्याने वडिलांचा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती कशी बिघडली त्याबद्दल सांगितलं. टायगर १२ वर्षांचा असताना त्याच्या आईने ‘बूम’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, कतरिना कैफ, झीनत अमान, गुलशन ग्रोव्हर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. महत्त्वाचं म्हणजे कतरिना कैफचा हा पहिलाच चित्रपट होता. यातून ती बॉलीवूडमध्ये पादर्पण करत होती. पण, चित्रपटात इतकी मोठी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट काही खास चालला नाही आणि यामुळे श्रॉफ कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं.

याबाबत बोलताना टायगर म्हणाला, “अशीसुद्धा एक वेळ होती, जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी आमच्या घरातील एक एक वस्तू कमी होताना पाहिली आहे. मी ज्या बेडवर झोपायचो तोसुद्धा विकावा लागला होता; तेव्हा मी जमिनीवर झोपत असे. तेव्हा मला मी काम केलं पाहिजे असं वाटायचं, पण मी काहीच करू शकत नव्हतो”. एवढंच काय तर जॅकी श्रॉफ यांना यामुळे त्यांचं वांद्रे येथील राहतं घर विकावं लागलं आणि नंतर त्यांनी दुसरीकडे एक छोटंसं घर खरेदी केलं. परंतु, ‘हिरोपंती’ या चित्रपटानंतर टायगर श्रॉफने इतपत पैसे कमवले होते की तो त्यांना नवीन घर खरेदी करून देऊ शकत होता. पुढे कालांतराने त्याने खार येथे त्याच्या आईला आठ बीएचके इतकं मोठं घर भेट म्हणून दिलं.

दरम्यान, जॅकी श्रॉफ यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी (स्क्रीन) संवाद साधताना टायगरबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले, “टायगरने जेव्हा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हापासूनच त्याचं त्याच्या आईसाठी एक घर खरेदी करण्याचं स्वप्न होतं. एक मुलगा त्याच्या आईसाठी असं काहीतरी करतोय हे पाहून बरं वाटतं, तो खूप गोड मुलगा आहे.”