Tejaswini Pandit Instagram Post : राज्यामध्ये सध्या हिंदी विरुद्ध मराठी यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याविरोधात शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधून विरोध अधिकच तीव्र झाला आहे. अनिवार्य हा शब्द काढण्यात आला असला, तरी हिंदी ही पर्यायी भाषा आणल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

हिंदी भाषा सक्तीबद्दलच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आधीपासूनच आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राज ठाकरे यांनी काल (२६ जून) रोजी पत्रकार परिषद घेत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. राज ठाकरे यांनी ५ जुलै, शनिवार रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली असून अनेकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहनही केलं आहे.

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनेही या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तेजस्विनी पंडीत सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिची राजकीय आणि सामाजिक मतं शेअर करत असते. तसंच ती राज ठाकरेंबद्दलच्या अनेक पोस्टही शेअर करत असते. अशातच तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठीची सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

तेजस्विनी पंडीत इन्स्टाग्राम पोस्ट

तेजस्विनी पंडीतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमध्ये ती म्हणते, “मराठीसाठी, मराठी माणसांसाठी निघणाऱ्या मोर्च्याचं स्वागत आणि त्याला पाठिंबा आहे. मोर्चा हा ‘मराठी माणसासाठी’ असेल आणि त्याचं नेतृत्व ‘मराठी माणूस’ करेल ही अपेक्षा. मी तर येईनच, पण महाराष्ट्रावर, मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती, ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी या.”

यानंतर तेजस्विनीने “आता स्थगिती नको, तर निर्णय हवा आहे” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने जे मुंबईबाहेर आहेत आणि ज्यांना प्रत्यक्ष येणं शक्य नाही, त्यांनी गुगल फॉर्मद्वारे त्यांचा हिंदी सक्तीला विरोध नोंदवावा असंही म्हटलं आहे. याबरोबरच तेजस्विनीने “विरोध भाषेला नाही, सक्त्तीला आहे” असं ठाम मतही या इन्स्टाग्राम स्टोरीमधून व्यक्त केलं आहे.

राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधातला मोर्चा येत्या ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर काढण्यात येणार आहे, असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, सरकारच्या हिंदी भाषेच्या निर्णयावर हेमंत ढोमे, अरविंद जगताप, सचिन गोस्वामी, प्रथमेश शिवलकर, समीर चौघुले, मकरंद अनासपुरे, वैभव मांगले यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.